MSEB : एप्रिलपासून स्मार्ट मीटर; आता मोबाईलप्रमाणे करावा लागणार रिचार्ज; पैसे संपले तर..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
MSEB : ग्राहकांकडे जावून दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करून वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : वाढीव वीजबिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे. एप्रिलपासून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने महावितरणचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात जवळपास 6 लाख 19 हजार स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या असून, ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर ग्राहकांना मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे. विजेसाठी किती खर्च करायचा, हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे. जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून एप्रिलपासून जिल्ह्यात स्मार्ट मीटर लागण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
advertisement
स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये
- वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल.
- वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल.
- विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होईल.
- रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.
- रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत संपली, तरी वीजपुरवठा सुरु राहील. मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल. त्यावेळी रिचार्ज संपल्यावर वापरलेल्या वीजेची रक्कम कपात होईल.
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
March 18, 2024 7:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
MSEB : एप्रिलपासून स्मार्ट मीटर; आता मोबाईलप्रमाणे करावा लागणार रिचार्ज; पैसे संपले तर..