घरातून निघाले अन् भयंकर घडलं, 27 दिवस कुटुंबानं शोधलं, पण तोवर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सखाराम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी नातेवाईक, ओळखीचे आणि परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबवली. परंतु त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही.
छत्रपती संभाजीनगर: गेल्या 27 दिवसांपासून पतीचा शोध घेणाऱ्या उषा चांदणे यांना पोलिसांचा फोन गेला आणि गारखेडा परिसरातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सखाराम चांदणे (वय 40) यांचं अपघाती निधन झालं. पण, ओळख न पटल्याने बेवारस म्हणून एका सामाजिक संस्थेने अंत्यविधी केला. याबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्यातच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील इंदिरानगरमध्ये राहणारे सखाराम विठ्ठल चांदणे (40) हे पत्नी, आई आणि मुलांसह वास्तव्यास होते. रंगकामाची कामे करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 29 नोव्हेंबर रोजी सखाराम नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, त्या दिवसानंतर ते घरी परतलेच नाहीत. सखाराम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी नातेवाईक, ओळखीचे आणि परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबवली. परंतु त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. विशेष म्हणजे सखाराम यांच्याकडे मोबाइल नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग कुटुंबीयांकडे उपलब्ध नव्हता.
advertisement
माझा मुलगा परत येईल, या आशेवर सखाराम यांच्या आई, 60 वर्षीय कुसुम चांदणे यांनी तब्बल वीस दिवस वाट पाहिली. मात्र, दिवसागणिक चिंता वाढत गेली आणि अखेर कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे 22 डिसेंबर रोजी हवालदिल झालेल्या कुसुम यांनी आपल्या मुलाचा शोध लागावा यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
मृतदेहाचे छायाचित्र पाहून पत्नीने ओळखले...
जवाहरनगर पोलिसांनी सखाराम यांच्या आईकडून मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शोध सुरू केला होता. या दरम्यान पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपघातातील जखमी व्यक्तीचा फोटो सखाराम यांच्या छायाचित्राशी मिळता-जुळता असल्याचे आढळून आले. याची खात्री करण्यासाठी 24 डिसेंबर रोजी पोलिसांनी कुसुम चांदणे यांना पुंडलिकनगर ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर कुसुम या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात हजर झाल्या.
advertisement
शेवटचं पाहताही आलं नाही!
पोलिसांनी सखाराम यांच्या कुटुंबीयांना एका अनोळखी मृत व्यक्तीचा छायाचित्र दाखवले. तो फोटो पाहताच सखाराम यांच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अनोळखी म्हणून नोंद असलेला तो मृतदेह आपल्या पतीचाच असल्याची ओळख त्यांनी भावूक अवस्थेत पटवली. सखाराम 29 नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडताच सकाळी साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
अपघातानंतर त्यांची ओळख न पटल्याने ना कुटुंबीयांचा शोध लागला, ना कोणी पुढे आले. अखेर कुटुंब सापडत नसल्यामुळे 22 डिसेंबर रोजी पोलिसांनी पंचशील महिला बचत गटाच्या सहकार्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे घरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर सखाराम यांचा मृत्यू झाला, तरीही इतक्या दिवसांपर्यंत त्यांची ओळख उघड होऊ शकली नाही.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घरातून निघाले अन् भयंकर घडलं, 27 दिवस कुटुंबानं शोधलं, पण तोवर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं








