'वारकरी संप्रदायाची क्षमा मागतो', अखेर गोविंदगिरी महाराजांनी मागितली माफी
- Published by:Sachin S
Last Updated:
'मी केलेले वक्तव्य विद्वानांनाही लक्षात येणं अवघड होऊ लागल्याने, दासबोध ग्रंथाबद्दल केलेलं वक्तव्य मी मागे घेत असून, वारकरी संप्रदायाची क्षमा मागतो'
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’ हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘एकनाथी भागवत’ ही भाष्यं असून ‘तुकाराम गाथा’ आणि ‘नामदेव गाथा’ या संकलन स्वरूपातील असल्यानं त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येणार नाही, असं ते म्हणले होते...त्यांच्या या विधानानंतर वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेरीस गोविंद देवगिरी महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घेत वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. एका विद्यापीठातील चर्चासत्रादरम्यान त्यांनी केलेल्या विधानामुळे वारकरी संप्रदायामध्ये मोठी नाराजी पसरली होती. 'ज्ञानोबा ते तुकोबा' या विषयावरील कार्यक्रमात बोलताना महाराजांनी समर्थ रामदास स्वामींच्या 'दासबोध' ग्रंथाचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे दासबोध हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या साहित्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असा संदेश गेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
advertisement
या वादावर पडदा टाकण्यासाठी महाराजांनी एक व्हिडिओ जारी केला. "चर्चासत्राच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असल्यानं आपण दासबोधाचा संदर्भ दिला होता, कोणाचीही तुलना करणे किंवा कोणाला श्रेष्ठ ठरवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ ग्रंथाच्या रचनेच्या दृष्टीने आपण ते भाष्य केले होते, असंही महाराजांनी स्पष्टीकरण दिलं.
advertisement
मी केलेले वक्तव्य विद्वानांनाही लक्षात येणं अवघड होऊ लागल्याने, दासबोध ग्रंथाबद्दल केलेलं वक्तव्य मी मागे घेत असून, वारकरी संप्रदायाची क्षमा मागतो असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी स्वतःच वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकलाय.
"दासबोध ग्रंथ हा रचनेच्या दृष्टीने वेगळा आहे, हे सांगत असताना आपल्याला दासबोध इतर ग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे" असं म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरण देत गोविंदगिरी महाराजांनी त्या संदर्भातली प्रतिक्रिया पोस्ट केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 9:56 PM IST









