Weather Alert: पुढचे दोन दिवस मोठे संकटाचे, प्रचंड उष्णता वाढणार हवामान खात्याचा अलर्ट, 10 जिल्ह्यात तापमान 40 च्या वर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Heat Wave Alert weather Update: बाप रे! मार्चमध्येच मे महिन्याचा भयानक जाळ; 'हे' १० जिल्हे सर्वाधिक होरपळणार, हवामान खात्याचा इशारा ऐकून तुम्हालाही फुटेल घाम!
मार्च महिना अर्धाही सरला नाही, तोच महाराष्ट्रात उन्हाने आपला 'सिकंजा' आवळायला सुरुवात केली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत जे घडले नाही, ते यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पाहायला मिळत आहे. विदर्भातील अकोला येथे तापमानाचा पारा सुमारे ४१ अंशावर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हा क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगचा थेट फटका आहे.
विदर्भासह सोलापूर-ठाणे होरपळले!
यंदाचा उन्हाळा भीषण असेल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता, पण मार्चच्या पहिल्या १० दिवसांतच तापमानाने ४० अंशांचा आकडा पार केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केवळ अकोलाच नाही, तर सोलापूरमध्येही पारा ४०.२ अंशांवर गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, किनारपट्टीच्या जवळ असूनही ठाण्यात तापमान ३९ अंशांच्या घरात पोहोचले आहे. वाशिम, अमरावती, वर्धा आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले असून, दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.
advertisement
दिल्लीतही १५ वर्षांचा विक्रम मोडीत
राजधानी दिल्लीत सामान्यतः मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमान ३५ अंशांच्या पुढे जाते, मात्र यंदा ७ मार्च रोजीच पारा ३५ अंशांच्या पार गेला आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान सामान्यपेक्षा ६.५ अंशांनी जास्त असल्याने तिथे भीषण उष्णतेची लाट आहे. जर हे तापमान सामान्यपेक्षा ७ अंशांनी जास्त झाले, तर ती 'सीवियर हीट वेव्ह' मानली जाते.
advertisement
पिकांवर काय होणार परिणाम?
वेळेआधी आलेल्या या उष्णतेचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. गहू आणि इतर पिकांना दाणे भरण्याच्या काळात थंडीची आवश्यकता असते. मात्र, आता उष्णता अचानक वाढल्याने पिके वेळेपूर्वीच परिपक्व होतील. ज्या शेंगभाज्या अथवा बिया असलेली फळ आहेत ती लवकर खराब होण्याचा धोका असतो. पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत मोठी घट होईल. गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.
advertisement
उन्हाचा तडाखा का वाढला?
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, सध्या राजस्थान आणि पश्चिम पाकिस्तानच्या बाजूने येणारे अँटी-सायक्लोन सक्रिय झाले आहे. यामुळे आकाशातील ढग पूर्णपणे गायब झाले असून कडक ऊन जमिनीवर येत आहे. तसेच, उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचत असल्याने तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.
advertisement
पाऊस कुठे पडणार?
एकीकडे महाराष्ट्र तापत असताना, उत्तरेकडे एक 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रिय झाला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या उंच डोंगराळ भागात आज रात्रीपासून हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १० आणि ११ मार्च रोजी ईशान्य भारत आणि केरळच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तूर्तास तरी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 6:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: पुढचे दोन दिवस मोठे संकटाचे, प्रचंड उष्णता वाढणार हवामान खात्याचा अलर्ट, 10 जिल्ह्यात तापमान 40 च्या वर








