मराठा आंदोलनामुळे मुंबई लोकलचे तीन तेरा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; घरी परतणाऱ्यांचे होणार हाल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मराठा आंदोलकांनी सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात केली असून पश्चिम रेल्वेही कोलमडण्याची शक्यता आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव आज मुंबईत धडकले. भगव्या झेंड्यांनी आणि घोषणाबाजीने दक्षिण मुंबई दणाणून गेली. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत होते. या मोठ्या लोंढ्यामुळे दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला असून अनेक प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातही प्रचंड गर्दी झाली. मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांतून आलेले आंदोलनकर्ते सीएसएमटीवर उतरल्याने रेल्वे स्टेशन परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झासे. मध्य रेल्वेच्या गाड्याही काही काळ उशिरा धावू लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गाड्या दहा मिनिटांच्या विलंबाने सुटत आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळी गाड्या उशीराने धावत असल्याने मुंबईकरांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरा
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील ट्रॅकवर आंदोलक उतरल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. संध्याकाळी गर्दीची वेळ असल्याने गाडीत चढण्यासाठी झुंबड उडाली आहे. वेळेत घरी पोहोचण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो. मात्र आज प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
advertisement
सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात
मराठा आंदोलकांनी सीएसएमटीनंतर आता चर्चगेट स्टेशन काबीज करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील जोरदार पावसाने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात, आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेताना दिसत आहे.
रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सरकारवरचा दबाव आणखी वाढला असून आगामी दिवसांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
advertisement
सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंचं आवाहन
सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांनी शांत राहावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. तसंच दोन-चार जणांमुळे आंदोलन बदनाम होतंय, असं म्हणत जरांगेंनी फटकारलंय. गोंधळ घालणारे कुठले आहेत ते तपासा, असंही आवाहन जरांगेंनी केलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठा आंदोलनामुळे मुंबई लोकलचे तीन तेरा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; घरी परतणाऱ्यांचे होणार हाल


