Manoj Jarange Patil : गोळ्या घाला किंवा हल्ला करा, 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण, जरांगेंची मोठी घोषणा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil Maratha Reservation : शेतीची कामे उरकून 29 ऑगस्ट रोजी मुंबईत यायचं असल्याची साद जरांगे पाटील यांनी घातली आहे. मुंबईत उपोषण करणार असून आता मुंबईतून विजयी यात्रा निघेल अथवा अंत्ययात्रा निघेल असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, छत्रपती संभाजी नगर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी थेट मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. शेतीची कामे उरकून 29 ऑगस्ट रोजी मुंबईत यायचं असल्याची साद जरांगे पाटील यांनी घातली आहे. मुंबईत उपोषण करणार असून आता मुंबईतून विजयी यात्रा निघेल अथवा अंत्ययात्रा निघेल असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
जालनामधील अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलकांचा आक्रोश आता अधिक तीव्र होत असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आंदोलकांनी उग्र पवित्रा घेतला आहे. जरांगे यांनी म्हटले की, दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत.मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. आता आम्ही संयम तरी किती दिवस ठेवायचा असा सवाल त्यांनी केला.
advertisement
आता माघार नाही, मोठा उठाव करणार...
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाला आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
advertisement
सोबत येणाऱ्यांनी तयारी करून यावं...
मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत येणाऱ्या मराठा आंदोलकांनी 20 ते 25 दिवसांची तयारी करुन यावं असे आवाहन केले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता शांत बसून चालणार नाही असेही त्यांनी म्हटले.
advertisement
शेतीची कामं उरकून घ्या...
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आता ऊन जास्त आहे शेतीत कामे सुरू आहेत. जूनमध्ये पेरण्या पूर्ण होतील. सर्व कामे आटोपून मुंबईला जायचे आहे. सगळ्यांनी कामं उरकायला सुरुवात करा, असे आवाहन केले. 1 ऑगस्ट रोजी आंदोलनाची पुढील दिशा सांगणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 30, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : गोळ्या घाला किंवा हल्ला करा, 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण, जरांगेंची मोठी घोषणा








