निसर्ग कोपला! हातातोंडाशी आलेलं पिक वाया, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
यंदा निसर्गाने पाठ फिरवल्याने राऊत यांच्या हातात निराशाच आली आहे. कडाक्याची थंडी आणि परतीच्या पावसाचा फटका बटाटा पिकाला बसला. यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील शेतकरी देवराव राऊत गेल्या 10 ते 12 वर्षांपासून बटाट्याची शेती करत आहेत. दरवर्षी या पिकातून त्यांना सरासरी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. मात्र यंदा निसर्गाने पाठ फिरवल्याने राऊत यांच्या हातात निराशाच आली आहे. कडाक्याची थंडी आणि परतीच्या पावसाचा फटका बटाटा पिकाला बसला. यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
एकीकडे उत्पन्न घटले असून दुसरीकडे शेतीचा खर्च मात्र वाढलेला आहे. बियाणे, खत, औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे बटाटा शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याचे देवराव राऊत यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये 13 ऑक्टोबर 2025 रोजी बटाटा या पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यावेळी बटाट्याला प्रति क्विंटल 3400 रुपये भाव होता.
advertisement
बटाट्याची लागवड केल्यानंतर आठ दिवस सारखा पाऊस सुरू होता. अति पावसामुळे उगवण शक्तीवर परिणाम झाला. तसेच पीक जोमात आले असताना नोव्हेंबर दरम्यान कडाक्याची थंडी पडली त्यामुळे उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाले. जे उत्पन्न निघणे अपेक्षित होते ते उत्पन्न निघत नाही. याबरोबरच रासायनिक खतं, बुरशीनाशक यासह बटाटा पिकासाठी लागणाऱ्या विविध खत-औषधांचे तसेच रोजगाराचा प्रत्येकी 300 रुपये खर्च आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने शेतीला लावलेला खर्च निघाला आहे. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
advertisement
बटाटा पिक तयार होईपर्यंत बियाणं आणि मजुरीचे 50 ते 55 हजार खर्च यासाठी आला आहे. या शेतीच्या माध्यमातून 1 लाख 10 हजार उत्पन्न निघू शकते मात्र सर्व खर्च वजा करून 30 ते 35 हजार रुपये हातात मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या घडीला बटाट्याला 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आणि बियाणं 3400 क्विंटल घेतले होते. निसर्गाच्या आणि वातावरणाच्या चढउतारामुळे बटाटा पिक डबघाईला येते. यामुळे कर्जबाजारी होण्याची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे शासनाने खते, बुरशीनाशके आणि कीटकनाशके यांचे भाव कमी करायला पाहिजे अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 3:53 PM IST










