Pune: पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा अचानक हल्ला, ६५ जण जखमी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पालखी सोहळ्यादरम्यान काही जणांनी फटाके वाजवल्याने मधमाशा भडकून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यात ६५ हून अधिक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर राजगडमधील वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पालखी सोहळ्यादरम्यान काही जणांनी फटाके वाजवल्याने मधमाशा भडकून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारंभ सुरू होता. त्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान पालखी मंदिराजवळ आल्यानंतर ती जमिनीवर ठेवताच अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला.
advertisement
त्यानंतर ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. अनेकजण सैरावैरा पळू लागले, काहींनी मंदिरात आश्रय घेतला तर काहींनी जवळच्या घरांमध्ये धाव घेत स्वतःचा बचाव केला. या घटनेत २३ महिला, ३० पुरुष आणि १२ लहान मुलांसह एकूण ६५ हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतलाय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 6:11 PM IST







