महाराष्ट्राच्या जनतेचा मी ऋणी...राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे. महायुतीकडून 6 तर महाविकास आघाडीकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
advertisement
१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले.
१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे.
advertisement
महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे.
महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल.
advertisement
सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 9:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राच्या जनतेचा मी ऋणी...राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया








