बायकोवर परपुरूषाचं प्रेम, सोलापुरात जोडप्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत काळीज चिरणारी व्यथा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापुरात पती-पत्नीनं एकत्र विष प्राशन करून जीवन संपवल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील आत्महत्येचे धक्कादायक कारण समोर आलं आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापुरात पती-पत्नीनं एकत्र विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील आत्महत्येचे धक्कादायक कारण समोर आलं आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीपोटी या दाम्पत्याने आपले जीवन संपवल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.
नेमकी घटना काय?
सोमनाथ धानोप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असं आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. हे दाम्पत्य सोलापुरात वास्तव्यास होतं. त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय होता. त्यांना दोन लहान मुलं आहेत. शुक्रवारी या दोघांनीही विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं. घटनेच्या वेळी त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून त्यांच्या मुलांनी तातडीने आपले काका नवनाथ पाटील यांना ही माहिती दिली. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.
advertisement
सुसाईड नोटमध्ये 'त्या' नावाचा उल्लेख
आत्महत्या करण्यापूर्वी सोमनाथ आणि श्रीदेवी यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये विजयपूर येथील अभिषेक कोरे या व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. यातून तो वारंवार त्यांना फोन करून आणि भेटून त्रास देत होता. तसेच या दाम्पत्याला समाजात बदनाम करण्याची धमकी देखील त्याने दिली होती.
advertisement
आरोपी अभिषेक कोरेच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून अखेर पाटील दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवली. सुसाईड नोटमधील नावाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक कोरे याला विजयपूर येथून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायकोवर परपुरूषाचं प्रेम, सोलापुरात जोडप्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत काळीज चिरणारी व्यथा








