Thane Water Supply: ऐन पावसाळ्यात ठाण्यात तब्बल 24 तास पाणी होणार गायब! पाणीबाणीचं काय आहे कारण?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Water Supply: नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
ठाणे: ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीकरांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 18 ते 19 सप्टेंबर (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी बारवी जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम करणार आहे. त्यामुळे ठाणे, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद राहील.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपासून ते 19 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे ठाणे महानगरपालिके अंतर्गत कळवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31चा काही भाग वगळता), दिवा, वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींच्या काही भागात शुक्रवारी (19 सप्टेंबर) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा देखील 24 तासांसाठी बंद राहिल.
advertisement
बारवी धरणातून येणारं पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसी घेते. तिथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा व मुंब्रा परिसराला वितरित केलं जातं. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडीत होईल.
advertisement
संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असं आवाहन एमआयडीसीने केलं आहे. 18 ते 19 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने देखील केलं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Water Supply: ऐन पावसाळ्यात ठाण्यात तब्बल 24 तास पाणी होणार गायब! पाणीबाणीचं काय आहे कारण?