तारीख 12 जून 2018, त्यादिवशी भय्यूजी महाराजांसोबत काय घडलं? महाराष्ट्रात राष्ट्रसंतांची पुन्हा का होतीय चर्चा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
इंदूर येथील एका हॉटेलमध्ये धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता. पण राजकीय अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी धनंजय मुंडेंचा जीव वाचवला, असा सनसनाटी गौप्यस्फोट गुट्टे यांनी केला.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. इंदूर येथील एका हॉटेलमध्ये धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता. पण राजकीय अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी धनंजय मुंडेंचा जीव वाचवला, असा सनसनाटी गौप्यस्फोट गुट्टे यांनी केला. गुट्टे यांच्या गौप्यस्फोटानंतर भय्यूजी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या मृत्यूची देखील चर्चा होत आहे.
याचं कारण म्हणजे रत्नाकर गुट्टे यांनी ज्या हॉटेलचा उल्लेख केलाय. ते हॉटेल इंदूर मधील आहे. शिवाय भय्यूजी महाराज यांचा मृत्यू देखील इंदूरमध्ये झाला होता. त्यामुळे आता या दोन प्रकरणांना एकमेकांशी जोडलं जातंय. त्यामुळे भय्यूजी महाराजांसोबत इंदूरमध्ये काय घडलं? १२ जून २०१८ ला त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? जाणून घेऊयात सविस्तर...
advertisement
१२ जून २०१८ ला भय्यूजी महाराजांसोबत काय घडलं?
विविध मीडिया रिपोर्टनुसार, १२ जून २०१८ रोजी मंगळवार होता. ते आपल्या 'सिल्व्हर स्प्रिंग्ज' निवासस्थानी होते. याच दिवशी त्यांची मुलगी कुहू पुण्याहून इंदूरला येणार होती. तिची खोली अस्ताव्यस्त असल्याचे पाहून भय्यूजी महाराज आपल्या नोकरांना ओरडले आणि खोली नीट आवरायला सांगितली. यावेळी त्यांची पत्नीही घरी नव्हती. काही वेळाने महाराजांनी आपल्या मुलीच्या खोलीतच स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. तेव्हा ते ५० वर्षांचे होते.
advertisement
कुहू घरी आल्यावर तिनं वडिलांचा मृतदेह पाहिला आणि आपल्या सावत्र आईमुळंच भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला. इतकंच नव्हे, डॉ. आयुषीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असून तिला अटक करण्याची विनंतीही कुहूनं पोलिसांकडे केली होती. पुढे २०१९ मध्ये भय्यूजी महाराजांच्या मृत्यूचा उलगडा झाला होता. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टानं तिघांना 6 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यात एका महिलेसह इतर दोघांचा समावेश आहे.
advertisement
रत्नाकर गुट्टे नक्की काय म्हणाले?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली आहे. "धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो, असं रत्नाकर गुट्टे म्हणाले.
advertisement
धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी गंगाखेडमध्ये सभा घेतली होती. या सभेत त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर १६०० कोटींचं कर्ज उचललं ते नीरव मोदी आहेत, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी टीका केली होती. याला उत्तर देताना गुट्टे यांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तारीख 12 जून 2018, त्यादिवशी भय्यूजी महाराजांसोबत काय घडलं? महाराष्ट्रात राष्ट्रसंतांची पुन्हा का होतीय चर्चा


