Share Market Prediction: शेअर बाजारात विनाशकाळ, पैसा लावणे मोठी चूक; प्रसिद्ध गुंतवणूकदाराने केली भविष्यवाणी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढील काही वर्षे आव्हानात्मक ठरू शकतात. प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या मते, निफ्टी 50 पुढील 4-5 वर्षे मोठा परतावा देणार नाही. स्मॉलकॅप शेअर्सवर सर्वाधिक दबाव राहील आणि मोठ्या तेजीचा कालावधी संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. गेल्या काही महिन्यात सुरू झालेली ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा आशावाद काही जण व्यक्त करत आहेत. गुंतवणुकदारांचे गेल्या काही महिन्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत बाजारात पुन्हा तेजी येईल असे म्हटले जात आहे. मात्र भारतीय शेअर बाजारात आगामी काही वर्षांत मोठी तेजी दिसणार नाही, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी केली आहे. मनीकंट्रोल ग्लोबल वेल्थ समिट 2025 दरम्यान त्यांनी सांगितले की, निफ्टी 50 सप्टेंबर 2024 नंतरच्या उच्चांकावरून पुढील 4-5 वर्षे कोणताही महत्त्वाचा परतावा देऊ शकणार नाही. बाजारात आलेली तेजी संपली असून, आता बुल मार्केटचा वेग मंदावणार आहे.
स्मॉलकॅप शेअर्सवर सर्वाधिक दबाव! मोठी घसरण होणार
शंकर शर्मा यांच्या मते, या मंदीच्या टप्प्यात स्मॉलकॅप शेअर्सवर सर्वाधिक दबाव राहील. गेल्या काही वर्षांत स्मॉलकॅप शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला असला तरी आता किरकोळ मंदीही या शेअर्ससाठी मोठी घसरण घेऊन येऊ शकते. बुल मार्केटचा एक सायकल असतो, जो साधारणतः 5 वर्षे टिकतो आणि सध्या हा सायकल संपण्याच्या टप्प्यात आहे.
advertisement
मोठी घसरण नाही, पण मंदी राहणार
लार्जकॅप स्टॉक्सबाबत बोलताना शर्मा म्हणाले की, हे शेअर्स सहसा 50% पर्यंत घसरत नाहीत, मात्र त्यामध्ये स्थिरता आणि संथ वाढ राहते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या परताव्याची अपेक्षा न करता बाजाराची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. ओव्हर व्हॅल्यूएशन संपवण्यासाठी लार्जकॅप स्टॉक्स हळूहळू खाली येतील आणि त्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
advertisement
2030 पर्यंत मोठा बुल रन शक्य?
शंकर शर्मा यांच्या मते, बाजारात मोठी तेजी येण्यास वेळ लागू शकतो आणि 2030 पर्यंतच पुढील बुल रन दिसण्याची शक्यता आहे. त्यांनी ‘लेक रिटर्न थिअरी’द्वारे हे स्पष्ट केले की, कोणत्याही मालमत्तेच्या प्रकारात (Asset Class) मर्यादित परतावा असतो. कोविडनंतर आलेली बाजारातील मोठी तेजी आता संपली आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय करावे?
शंकर शर्मा यांच्या मतानुसार, पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांनी अतिरिक्त जोखीम घेण्याचे टाळावे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संयम बाळगावा. बाजार कधी आणि कसा वाढेल, हे जागतिक अर्थव्यवस्था आणि आर्थिक परिस्थितींवर अवलंबून असेल. त्यामुळे या काळात चांगल्या रणनीतीने गुंतवणूक करणे आणि बाजाराच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: शेअर बाजारात विनाशकाळ, पैसा लावणे मोठी चूक; प्रसिद्ध गुंतवणूकदाराने केली भविष्यवाणी