IAS Story : 5% कमीशनच्या नादात IAS अधिकाऱ्याच्या करिअरवर टांगती तलवार; अभिषेक प्रकाश यांची 'फिल्मी' कहाणी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
IAS Abhishek Prakash Story : ते म्हणतात ना की 'यशाच्या शिखरावर पोहोचण्यापेक्षा तिथे टिकून राहणे जास्त कठीण असते'. जेव्हा बुद्धिमत्तेला सत्तेची आणि पैशाची हाव ग्रासते, तेव्हा काय होते? याचे जिवंत उदाहरण म्हणजे 2006 बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक प्रकाश.
लखनऊ : प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपल्या मुलाने मोठे होऊन नाव कमवावे, त्यासाठी चांगले शिक्षण देण्यासाठीही आईवडील मागे पुढे पाहात नाहीत. ज्यांना शक्य आहे ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखोंचा खर्च ही करतात. तर काही लोक कर्ज घेऊन आपल्या मुलांना शिकवतात. पण त्याचं चीज मुलांनी केलं तर ठिक पण नाही केलं तर मात्र आईवडिलांसाठी मुलाचं अपयश पचवणं अशक्य होतं.
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे, त्यानंतर देशातील सर्वात कठीण मानली जाणारी 'यूपीएससी' परीक्षा पहिल्या दहांत येऊन उत्तीर्ण करणे, हे कोणत्याही तरुणासाठी यशाचे सर्वोच्च शिखर असते. पण, म्हणतात ना की 'यशाच्या शिखरावर पोहोचण्यापेक्षा तिथे टिकून राहणे जास्त कठीण असते'. जेव्हा बुद्धिमत्तेला सत्तेची आणि पैशाची हाव ग्रासते, तेव्हा काय होते? याचे जिवंत उदाहरण म्हणजे 2006 बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक प्रकाश.
advertisement
अभिषेक प्रकाश यांचा जन्म 21 डिसेंबर 1982 रोजी बिहारच्या सिवान जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अभ्यासात प्रचंड गती असलेल्या अभिषेक यांनी IIT रुरकी मधून बी.टेक पूर्ण केले. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी आपला मोर्चा सनदी सेवेकडे वळवला आणि 2005 मध्ये चक्क संपूर्ण भारतातून 8 वा क्रमांक पटकावला. एक तेजोमय कारकीर्द समोर असताना त्यांनी नागालँड केडरमधून आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
advertisement
अभिषेक प्रकाश यांच्या आयुष्यात प्रशासकीय फायलीं इतकेच महत्त्व त्यांच्या खाजगी नात्यांनाही मिळाले. 2009 बॅचच्या आयएएस अधिकारी अदिती सिंह यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी लग्न केले. बायको युपी केडरमध्ये असल्याने अभिषेक यांनी 'स्पाऊस ग्राउंड'वर नागालँड सोडून उत्तर प्रदेशात बदली करून घेतली. एकेकाळी या जोडीला युपी प्रशासनातील 'पावर कपल' म्हटले जायचे. मात्र, हे सुख अल्पकाळ टिकले. दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले की, अदिती सिंह यांनी चक्क शासनाकडे तक्रार करून अभिषेक यांना पुन्हा नागालँड केडरमध्ये धाडण्याची मागणी केली. अखेर दीर्घ कायदेशीर लढाईनंतर त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
अभिषेक प्रकाश यांच्या पतनला खरी सुरुवात झाली ती त्यांच्या 'इन्व्हेस्ट युपी' मधील कार्यकाळात. एका मोठ्या सौर ऊर्जा कंपनीचा (SAEL Solar) प्रकल्प मंजूर करण्यासाठी आणि अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या मध्यस्थाद्वारे (निकान्त जैन) 5 टक्के कमिशनची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप झाला. या तक्रारीचे ऑडिओ पुरावे थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले. मार्च 2025 मध्ये योगी सरकारने कठोर पाऊल उचलत त्यांना निलंबित केले.
advertisement
जानेवारी 2026 उजाडताच अभिषेक प्रकाश यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) 1600 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून, त्यात अभिषेक प्रकाश यांना अधिकृतपणे 'आरोपी' म्हणून पुरावे दाखल केले आहे. आता केवळ एसआयटीच नाही, तर अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे. तपासात त्यांची लखनऊपासून बरेलीपर्यंतची बेनामी मालमत्ता आणि अवैध गुंतवणुकीची माहिती समोर येत आहे.
advertisement
कालपर्यंत नवोदित आयएएस अधिकाऱ्यांना नीतिमत्तेचे धडे देणारे 'प्रकाश' आज स्वतःच भ्रष्टाचाराच्या अंधारात अडकले आहेत. त्यांची ही कहाणी सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी एक मोठा धडा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 5:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
IAS Story : 5% कमीशनच्या नादात IAS अधिकाऱ्याच्या करिअरवर टांगती तलवार; अभिषेक प्रकाश यांची 'फिल्मी' कहाणी









