आता भांडुप रेल्वे स्थानकात रिक्षा मिळणार नाही, प्रवाशांची होणार कसरत; कारण काय?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: बेस्ट बस अपघातानंतर प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत.
मुंबई: भांडुप रेल्वे स्थानक परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अपघातानंतर स्थानकाबाहेरील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिक्षांना थेट स्टेशनपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिम बाजूस ठराविक अंतरावर सीमारेषा आखण्यात आली आहे असून ती ओलांडणाऱ्या रिक्षाचालकांकडून 1500 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत फेरीवाल्यांना हटवले आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी रिक्षांची अनियंत्रित गर्दी ही मुख्य समस्या कायम होती. नवीन बंदीमुळे वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
तथापि बेस्ट बसचे धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप कायम आहे. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसते ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवासी अशोक अहेर यांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
दरम्यान, स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप अपूर्ण आहे. परिणामी अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही जण छत्र्यांचा किंवा जवळील शेडचा आधार घेतात तर काही प्रवासी उन्हापासून बचावासाठी छपराखाली थांबून ट्रेन येताच धाव घेताना दिसतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:21 AM IST








