पोलिसांच्या डोळ्यात मिरची, जेलमधून पळाला, 15 वर्षांपूर्वी मंगेश नारकरच्या भयंकर एन्काऊंटरने हादरली होती मुंबई!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली आहे. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे चेंबूरमध्ये गुंड मंगेश नारकरचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं.
रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली आहे. सरकारच्या स्वच्छता मॉनिटर अभियनासाठी काम करणाऱ्या रोहित आर्याने पवईतील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. सरकारने २ कोटीहून अधिकची रक्कम थकवली असल्याच्या कारणातून रोहित आर्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याने एका व्हिडीओत म्हटलं आहे. अडीच तास त्याने मुलांना ओलीस ठेवलं होतं. पण दहशतवादी विरोधी पथकाच्या अमोल वाघमारे यांनी त्याचं एन्काऊंटर केलं. त्याच्या छातीत गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रोहित आर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आता या एन्काऊंटरबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या एन्काऊंटरचं समर्थन केलंय. तर काहींनी एन्काऊंटरची गरज नव्हती, असं म्हटलं आहे. रोहित आर्याकडे एअरगन होती. शिवाय तो एकटाच होता, त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण मिळवणं पोलिसांसाठी सहज सोपं होतं, असाही मतप्रवाह आता समोर येत आहे. मात्र रोहित आर्या एन्काऊंटरमुळे १५ वर्षांपूर्वी कुख्यात गुंड मंगेश नारकरच्या एन्काऊंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
advertisement
गँगस्टर मंगेश नारकर एन्काऊंटर काय होतं?
१ नोव्हेंबर २०१० रोजी अश्विन नाईक टोळीचा महत्त्वाचा गुंड मंगेश नारकरचा चेंबूरमध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पण त्याने साथीदाराच्या मदतीने पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेत पुन्हा गुन्हेगारी विश्वात दहशत माजवायला सुरुवात केली होती. १ नोव्हेंबर २०१० रोजी तो चेंबूर परिसरात एका व्यावसायिकाकडून खंडणी घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा एक साथीदारही त्याच्यासोबत होता. पहाटे चार वाजता दोघंही संबंधित व्यावसायिकाकडे खंडणी घेण्यासाठी आले होते.
advertisement
पण पोलिसांना याची टीप आधीपासूनच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याप्रकारे सापळा रचला होता. ज्यावेळी मंगेश नारकर खंडणी घेण्यासाठी आला, तेव्हा पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. पण त्याने आपल्या गावठी कट्ट्यातून पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. या वेळी संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असता यात मंगेश नारकरचा मृत्यू झाला. या घटनेला उद्या बरोबर १५ वर्षे पूर्ण होतील. अशात पुन्हा एकदा मुंबईत रोहित आर्याचं एन्काऊंटर करण्यात आलं.
advertisement
मंगेश नारकर पोलिसांच्या तावडीतून कसा पळाला होता?
खरं तर, मंगेश नारकर गुन्हेगारी क्षेत्रात येण्यापूर्वी १९९३-९४ च्या काळात वडाळा परिसरातील एका बूक बायडींगच्या दुकानात शिपाई म्हणून काम करत होता. पण त्याने नोकरी सोडून गुन्हेगारी क्षेत्रा पाऊल ठेवलं. यासाठी त्याने अश्विन नाईकची टोळी जॉईन केली. या टोळीसोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्याने २००७ मध्ये स्वत:ची दरोडेखोरांची टोळी बनवली. यानंतर त्याने बेळगाव, निपानी येथील एक ज्वेलरी शॉप लुटलं होतं. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्याला तुरुंगवासही झाला. पण एक वर्षानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
advertisement
यानंतरही त्याची खोड मोडली नाही. त्याने आपला साथीदार सचिन कांबळे याच्याशी संगनमत करत मुंबईतल्या एका बारचे मालक कृष्णा शेट्टी यांच्याकडून खंडणी उकळण्याचा कट रचला. यावेळी त्यांनी बार मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. यात दोघंही गंभीर जखमी झाले. या प्रकरणात नारकला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
डोळ्यात मिरची टाकून पळाले
advertisement
पण ६ ऑक्टोबर २०१० रोजी मकोका कोर्टाने नारकरला नाशिक तुरुंगात हलवण्यात यावं, असे आदेश दिले. त्यानुसार त्यांना नाशिकच्या तुरुंगात हलवलं जात होतं. मात्र नारकरसह त्याच्या एका साथीदाराने पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पळ काढला होता. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबई पोलिसांनी नारकरचा चेंबूर परिसरात एन्काऊंटर केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पोलिसांच्या डोळ्यात मिरची, जेलमधून पळाला, 15 वर्षांपूर्वी मंगेश नारकरच्या भयंकर एन्काऊंटरने हादरली होती मुंबई!


