लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 1 मार्चपासून बंद होणार UTS App, कसं करायचं बुकिंग?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेल्वे प्रशासनाने UTS अॅप १ मार्चपासून बंद करून RailOne अॅप सुरू केले आहे. सर्व अनारक्षित तिकिटे आणि मासिक पास RailOne अॅपवरच मिळणार आहेत.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनारक्षित तिकिटे आणि मासिक पास काढण्यासाठी वापरले जाणारे लोकप्रिय UTS अॅप येत्या १ मार्चपासून कायमचे बंद करण्यात येणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे डिजिटल तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या सवयीत आता मोठा बदल होणार असून, १ मार्चपासून जुन्या अॅपवर कोणतेही तिकीट बुकिंग स्वीकारले जाणार नाही. जुन्या अॅपच्या जागी रेल्वेने आता RailOne हे नवीन आणि अधिक प्रगत अॅप प्रवाशांच्या सेवेत आणले आहे.
हे नवीन अॅप सध्याच्या तंत्रज्ञानाशी जुळणारे असून प्रवाशांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. १ मार्चपासून सर्व प्रकारची अनारक्षित तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे आणि रेल्वेचे मासिक पास केवळ RailOne अॅपच्या माध्यमातूनच बुक करता येतील. त्यामुळे प्रवाशांना आता हे नवीन अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे.
advertisement
रेल्वेने जुने अॅप बंद करण्यामागे तांत्रिक सुधारणा हे मुख्य कारण दिले आहे. अनेकदा UTS अॅप हँग होणे किंवा पेमेंटमध्ये तांत्रिक अडचणी येणे, अशा तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. RailOne अॅपमध्ये या सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, याचा इंटरफेस अतिशय सोपा आणि वेगवान ठेवण्यात आला आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना काही सेकंदांत आपले तिकीट किंवा पास आरक्षित करणे शक्य होणार आहे.
advertisement
प्रवाशांच्या मनात सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जुन्या UTS अॅपमधील आर-वॉलेट'मध्ये असलेल्या पैशांचे काय होणार? रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना त्यांचे जुन्या अॅपमधील पैसे नवीन RailOne अॅपमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली जाईल. १ मार्चपूर्वी याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, जेणेकरून प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार नाही. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी जुन्या अॅपमधील बॅलन्स वापरून संपवण्याचा सल्लाही दिला जात आहे.
advertisement
१ मार्चपासून होणारा हा बदल लक्षात घेता, रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी आतापासूनच आपल्या मोबाईलमध्ये RailOne अॅप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करून घ्यावी. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी नवीन अॅपशी आतापासूनच सराव करणे मुंबईकरांच्या फायद्याचे ठरेल, जेणेकरून त्यांचा रेल्वे प्रवास विनाव्यत्यय सुरू राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 1:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 1 मार्चपासून बंद होणार UTS App, कसं करायचं बुकिंग?








