मुंबई-पालघरकरांसाठी गुड न्यूज! अडीच तासांचा प्रवास होणार केवळ तासभरात; प्रकल्पाला सरकारची मंजुरी
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Uttan Virar Sea Bridge : उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या जोडरस्त्याला हिरवा कंदील मिळाल्याने मुंबई आणि पालघर परिसरातील किनारी वाहतुकीला मोठा वेग मिळणार आहे. विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल.
मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांशी संपर्क सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले की प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्य सचिव राजेशकुमार यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की 24.35 किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू हा प्रकल्प उत्तर-दक्षिण जोडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता उभारण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील नागरिकांना मुंबई शहराशी अधिक जलद आणि सुलभ संपर्क साधता येईल.
advertisement
सध्या मुंबईत उत्तर-दक्षिण जोडणी सुधारण्यासाठी अनेक पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. दक्षिण किनारी रस्ता, वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि अटल सेतू यांची कामे पूर्ण झाली असून ऑरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग आणि शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरू आहे. याचबरोबर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका विकसित करण्याचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
advertisement
बैठकीत विरार-अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ‘हुडको’कडून घेण्यात येणाऱ्या 2,000 कोटी रुपयांच्या कर्जास शासनाने हमी देण्यास मंजुरी दिली. यामुळे या मार्गिकेच्या कामाला गती मिळून भूसंपादन प्रक्रिया सुलभ होणार आहे.
126 किमी लांबीचा हा बहुउद्देशीय मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील संपर्क सुधारेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत विकासाला नवी चालना मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-पालघरकरांसाठी गुड न्यूज! अडीच तासांचा प्रवास होणार केवळ तासभरात; प्रकल्पाला सरकारची मंजुरी


