हिंदूंवर हल्ले, 1.25 कोटींनी जर ठरवले...; RSS चीफ मोहन भागवतांचा बांगलादेशाला क्लिअर मेसेज, कट्टरपंथीयांचे धाबे दणाणले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bangladesh Violence Against Hindus: बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या आणि निवडणूकपूर्व अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील देशातील हिंदूंच्या सुरक्षेवर ठाम भूमिका मांडली आहे.
मुंबई: बांगलादेशात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील देशातील हिंदूंच्या परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. बांगलादेशातील हिंदूंनी आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला, तर जगभरातील हिंदू समाज त्यांना साथ देईल, असे ते म्हणाले.
मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये आयोजित RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘100 Years of Sangh Journey: New Horizons’ या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. बांगलादेशात सुमारे 1.25 कोटी हिंदू आहेत. त्यांनी तिथेच राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला, तर जगभरातील हिंदू त्यांना मदत करतील,” असे भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांत वाढ
गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील, विशेषतः हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतविरोधी कट्टर विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिक चिघळली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवल्यानंतर देशभरात आंदोलनांचा भडका उडाला. याआधी 5 ऑगस्ट 2024 रोजी ‘जुलै उठाव’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी आंदोलनानंतर असंतोष वाढला होता.
advertisement
या गोंधळाच्या काळात विविध भागांत हिंदू नागरिकांना लक्ष्य करून जमावाकडून हल्ले करण्यात आले. व्यापारी, कामगार आणि विद्यार्थी यांच्यासह अनेक जण या हिंसाचारात ठार झाल्याची नोंद आहे. अनेक ठिकाणी निदर्शने संघटित हल्ल्यांमध्ये रूपांतरित झाली, असा आरोप मानवाधिकार संघटनांकडून करण्यात आला आहे.
भारत आता तोडता येणार नाही
देशांतर्गत मुद्द्यांवर बोलताना भागवत यांनी लोकसंख्येतील बदल, जन्मदर आणि बेकायदेशीर स्थलांतर यांचा उल्लेख केला. पूर्वीच्या सरकारांनी या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असा दावा त्यांनी केला. लोकसंख्येतील बदलांकडे आधी गंभीरपणे पाहिले गेले नाही. जन्मदर आणि बेकायदेशीर स्थलांतर ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. आता सरकार या मुद्द्यांवर काम करत आहे आणि ते यशस्वी होईल, असे ते म्हणाले. भारत आता तोडता येणार नाही. भारत तोडण्याचा प्रयत्न करणारे स्वतः तुटतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
advertisement
RSS चा निधी, जात आणि मुस्लिम भागातील काम
RSS च्या निधीविषयी बोलताना भागवत यांनी सांगितले की, संघ कोणत्याही कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक निधीवर अवलंबून नाही. आमचा निधी स्वयंसेवकांकडूनच येतो. प्रवासात आम्ही जेवण विकत घेत नाही, तर ‘टिफिन’ मागतो. हॉटेलमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जातीय मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले, “RSS मध्ये कोणत्याही जातीचा व्यक्ती सरसंघचालक होऊ शकतो. SC-ST असणे ही अडचण नाही आणि ब्राह्मण असणे ही पात्रता नाही. सुरुवात ब्राह्मणांपासून झाली असली, तरी संघ सर्व समाजासाठी काम करतो.
advertisement
मुस्लिमबहुल भागातील कामाबाबत बोलताना भागवत यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका स्पष्ट केली. तिथे आव्हाने असतात, पण आम्ही प्रतिसाद देत नाही. शिवीगाळ झाली तरी उत्तर देत नाही. त्यामुळे संघर्ष वाढत नाही, असे ते म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 5:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
हिंदूंवर हल्ले, 1.25 कोटींनी जर ठरवले...; RSS चीफ मोहन भागवतांचा बांगलादेशाला क्लिअर मेसेज, कट्टरपंथीयांचे धाबे दणाणले






