तुमचं बजेट कोलमडणार, इराणमधील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या किचनवर; तेल आयात ठप्प होण्याची भीती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Iran-Israel War: अमेरिका-इजरायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणसोबतचा संघर्ष तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. होर्मुज जलडमरूमध्यातील कोणताही अडथळा भारतासह अनेक देशांसाठी आर्थिक संकट ठरू शकतो.
नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा संयुक्त हल्ला केल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अमेरिकेने हवाई आणि सागरी मार्गाने कारवाई करत राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्था आणि लष्करी तळांसह सुमारे 30 ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र शक्ती बनू देणार नाही.
दरम्यान इराणनेही इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ला केला असून हा संघर्ष हळूहळू भीषण युद्धाच्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तणावाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होऊ शकतो. विशेषतः कच्च्या तेलाच्या आयात आणि किंमतींवर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढीची शक्यता
या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जगातील 40 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल Strait of Hormuz या महत्त्वाच्या जलमार्गातून वाहून नेले जाते. हा जगातील सर्वात व्यस्त तेलवाहतूक मार्ग मानला जातो आणि तो इराणच्या प्रभावक्षेत्रात येतो.
advertisement
भारत, चीनसह जगातील बहुतांश देश याच मार्गावर अवलंबून आहेत. हा जलमार्ग खाडी देशांतील तेल निर्यातदारांना जागतिक बाजारपेठांशी जोडतो. जर इराणने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला, तर जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.
भारताची वाढती अवलंबित्व
‘द प्रिंट’मधील एका वृत्तानुसार कमोडिटी ट्रॅकिंग फर्म केप्लरच्या आकडेवारीतून समोर आले आहे की भारताच्या एकूण तेल आयातीत होर्मुज चोकपॉइंटवरील अवलंबित्व 50 टक्क्यांहून अधिक झाले आहे. अलीकडच्या महिन्यांत यात आणखी वाढ झाली आहे. यावर्षी 24 फेब्रुवारीपर्यंत भारताने खाडी देशांतून सुमारे 2.6 दशलक्ष बॅरल प्रतिदिन (एमबीपीडी) कच्च्या तेलाची आयात केली आहे. यावरून भारताची खाडी देशांवरील अवलंबित्व स्पष्ट होते.
advertisement
होर्मुजमार्गे किती तेल येते?
तज्ज्ञांच्या मते होर्मुज जलडमरूमध्य हा अत्यंत संवेदनशील ‘चोकपॉइंट’ आहे. या अरुंद मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल वाहून नेले जाते. सऊदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिरात, कुवैत आणि कतार यांसारख्या खाडी उत्पादक देशांतून येणारे तेल चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या प्रमुख आशियाई बाजारपेठांकडे जाते.
advertisement
भारतावर किती वाढेल आर्थिक बोजा?
अमेरिकेतील ऊर्जा माहिती प्रशासन (EIA) च्या माहितीनुसार 2024 मध्ये होर्मुज जलडमरूमध्यमार्गे जाणाऱ्या कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूचा सुमारे 69 टक्के हिस्सा या मार्गावरून गेला आहे. या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास तेलपुरवठ्यात घट, वाहतूक खर्चात वाढ आणि विमा प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85-90 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे पुरवठ्यातील कोणतीही अडचण भारतासाठी महागडी ठरू शकते. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील आणि त्यामुळे महागाईत भर पडू शकते.
advertisement
भारताने वाढवली आयातीची विविधता
‘व्हिज्युअल कॅपिटलिस्ट’च्या माहितीनुसार भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या तेल आयातीत विविधता आणली आहे. भारत आता रशिया, इराक, सऊदी अरेबिया, यूएई, पश्चिम आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका, अमेरिका, कुवैत, मध्यपूर्वेतील इतर देश, मेक्सिको, युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया-पॅसिफिक आणि कॅनडा येथूनही तेल आयात करतो.
तरीसुद्धा होर्मुज जलडमरूमध्यात कोणतीही गंभीर अडचण निर्माण झाल्यास भारतासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे सध्याची परिस्थिती केवळ प्रादेशिक संघर्षापुरती मर्यादित नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेची मोठी परीक्षा ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 3:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
तुमचं बजेट कोलमडणार, इराणमधील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या किचनवर; तेल आयात ठप्प होण्याची भीती









