Ganesh Chaturthi 2023: श्री गणरायाला एकदंत का म्हणतात?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
वेगवेगळ्या कल्पनांनुसार, गणपतीची वेगवेगळी रूपंही ओळखली जातात.
मुंबई, 16 सप्टेंबर: सर्व देव-देवतांमध्ये श्री गणपती हे विघ्नहर्ता आहेत आणि प्रथम पूजनीय देव आहेत. पौराणिक कथांमध्ये श्री गणेशाच्या प्रत्येक अवयवाची वेगवेगळी रहस्यं सांगितली जातात, ज्यामध्ये श्री गणेशाच्या डोक्यात ब्रह्मलोक, नाभीत ब्रह्मांड आणि पायात सप्तलोक असल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या कल्पनांनुसार, गणपतीची वेगवेगळी रूपंही ओळखली जातात. काही कथा श्री गणपती एकदंत असल्यासंदर्भात आहेत. आज आम्ही येथे अशाच काही कथा सांगणार आहोत, ज्यापैकी सर्वांत प्रमाण कथा गणेश पुराणातली मानली जाते.
गणेश पुराणातली कथा
गणेश पुराणातल्या कथेनुसार, कार्तवीर्यार्जुनाचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. तिथं श्री गणपतीने त्यांचा रस्ता रोखला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यातून दोघांमध्ये युद्ध झाले. जेव्हा श्री गणपती युद्धात प्रबळ ठरू लागले तेव्हा परशुरामांनी भगवान शंकराने दिलेल्या कुऱ्हाडीचा वापर केला. त्यामुळे गणपतीचा एक दात तुटला. तेव्हापासून त्याला एकदंत म्हटलं जाऊ लागलं.
advertisement
भविष्य पुराणातली कथा
भविष्य पुराणातल्या कथेनुसार, श्री गणपतीचा भाऊ कार्तिकेय एकदा स्त्री आणि पुरुषांच्या लक्षणांविषयी ग्रंथ लिहीत होता. त्यात गणपतीने व्यत्यय आणला. त्यामुळे कार्तिकेयाला राग अनावर झाला आणि त्याने गणपतीचा एक दात तोडला. त्यानंतर भगवान शंकराच्या सांगण्यावरून कार्तिकेयाने तो त्याला परत दिला.
गजमुखासुरासाठी स्वतःचा दात तोडला
एका पौराणिक कथेनुसार, गजमुखासुर या राक्षसाला वश करण्यासाठी श्री गणपतीने स्वतःचा दात तोडला. कथेनुसार गजमुखासुराला कोणत्याही शस्त्राने न मरण्याचं वरदान होतं. याचा फायदा घेऊन तो ऋषीमुनींना आणि सर्वसामान्यांना त्रास देऊ लागला तेव्हा श्री गणरायाने त्याच्याशी युद्ध केलं आणि शस्त्र म्हणून एक दात तोडून त्याला वश केलं.
advertisement
महाभारतासाठी तोडला एक दात
एका कथेनुसार, महर्षी वेदव्यास यांच्या मुखातून आलेल्या महाभारताची कथा लिहिण्यासाठी श्री गणरायाने दात वापरला होता. कथेनुसार, जेव्हा वेदव्यासांनी श्री गणपतीला महाभारत लिहिण्यासाठी बोलावलं, तेव्हा महाभारताची कथा विनाखंड सांगितली जाईल या अटीवरच ते लिहिण्यास स्वीकारलं. महर्षींनी हे मान्य करून महाभारताचं लिखाण सुरू करण्यास सांगितलं, तेव्हा गणरायाची लेखणी तुटली. त्यामुळे महाभारताचं लिखाण थांबू नये म्हणून त्याने आपला एक दात तोडला आणि त्याद्वारे महाभारताचं लेखन पूर्ण केलं.
advertisement
माया आणि मायिक यांचा संयोग
श्री गणेशाचा एकच दात हा माया आणि मायिक याचा संयोग असल्याचंही म्हटलं जाते. या संदर्भात एकाशब्दात्मिका माया तस्यः सर्वसमुद्भवम् हा एक पौराणिक श्लोक आहे. श्री गणपतीच्या आरतीतही त्याचा 'एकदंत दयावंत' असा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2023 9:04 AM IST