40 वर्ष शेतीनं शिकवलं आता एकरी 10 लाखांचा नफा, सांगलीच्या पिसाळ कुटुंबाची यशोगाथा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बदलत्या हवामानास जिद्दीने तोंड देत येळावीच्या पिसाळ कुटुंबाने मात्र तब्बल 22 एकर द्राक्षबाग पिकवली आहे. अत्यंत कष्टाने उच्चांकी आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाऱ्या बागायतदार पिसाळ कुटुंबाची यशोगाथा जाणून घेऊ.
अत्यंत मेहनती आणि जिकिरीचे पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते. बदलते हवामान आणि वाढत्या कीड रोगांनी द्राक्ष उत्पादन घटत आहे. अशातच येळावीच्या पिसाळ कुटुंबाने मात्र तब्बल 22 एकर द्राक्षबाग पिकवली आहे. अत्यंत कष्टाने उच्चांकी आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाऱ्या बागायतदार पिसाळ कुटुंबाची यशोगाथा जाणून घेऊ.
advertisement
द्राक्षनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावचे रहिवाशी पिसाळ कुटुंबाचा शेती हा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते द्राक्ष शेती करत आहेत. महादेव, शंकर आणि लक्ष्मण या पिसाळ बंधूंकडे अडीच एकर वडिलोपार्जित शेतजमीन होती. त्यापैकी एक एकर क्षेत्रात त्यांनी 1985 साली पहिल्यांदा माणिकचमन द्राक्ष व्हरायटीचा प्रयोग केला. चांगल्या उत्पन्नाचा अनुभव घेत त्यांना द्राक्ष शेतीची आवड लागली. कुटुंबातील एकोपा जपत पिसाळ यांनी द्राक्ष शेतीतील अनेक चढ-उतार अनुभवले.
advertisement
advertisement
सरस्वतीसह लक्ष्मी : कुटुंबप्रमुख शंकर पिसाळ यांनी बी.एससी. केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले. कृषी अधिकारी म्हणून त्यांना कारखान्यांमध्ये नोकरी देखील मिळाली होती. परंतु नोकरीमध्ये मन रमले नाही. नोकरीपेक्षा शेतीची ओढ असल्याने राजीनामा देत आपले शेतीविषयक ज्ञान आपल्याच मातीमध्ये वापरल्याचे शंकर पिसाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. पिसाळ बंधूंची मुलं-मुली देखील शेतात राबत उच्चशिक्षित पदवीधर झाले आहेत. दोन्ही भावांसह कुटुंबातील 16 माणसांच्या एकीच्या बळाने शिक्षणासह आर्थिक समृद्धी देखील साधली आहे.
advertisement
सेंद्रिय खतांवर अधिक भर : छाटणीपूर्वी शेतीला एकरी चार ते पाच ट्रॉली शेणखत घालतात. बेसल डोस मध्ये 10: 26: 26, सुपर फॉस्फेट, एस.ओ.पी. व गंधक या मोजक्याच रासायनिक खतांचा वापर करतात. सेंद्रिय खतांवर सर्वाधिक भर देत असल्याचे बागायतदार शंकर पिसाळ यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले. यामध्ये अशोकाची नीम पेंड चार बॅगा, मासळी पावडर दोन बॅगा ही सेंद्रिय खते वापरतात. छाटणीनंतर 75 ते 80 दिवसांनी पोटॅश, निमपेंड आणि मासळी पावडर हा डोस दिला जातो. फ्लाॅवरिंग स्टेजमध्ये जी.ए. या संप्रेकाच्या तीन ते चार फवारण्या करतात. विद्राव्य खते ठिबक मधून नियमित देतात.
advertisement
विविध द्राक्षवाणांची लागवड : पिसाळ बंधूंनी शेतामध्ये वेगवेगळ्या द्राक्ष वाणांची लागवड केली आहे. पाच एकर शरद, तीन एकरावर माणिकचमन, साडेपाच एकरावर अनुष्का तसेच पाच एकरावर एस.एस.एन. अशा चार जातींच्या द्राक्षांची लागवड केली आहे. अभ्यास आणि अनुभवातून पिसाळ बंधू प्रत्येक द्राक्ष व्हरायटीपासून उच्चांकी उत्पादन मिळवत आहेत.
advertisement
अकरा वर्षांपासून द्राक्ष निर्यात : पिसाळ बंधूंच्या शेतामध्ये अनुष्का, एस.एस.एन. या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालणाऱ्या द्राक्ष व्हरायटी आहेत. रंग, चव आणि आकारासह दर्जेदार द्राक्ष उत्पादित करत गेल्या अकरा वर्षांपासून द्राक्ष निर्यात करत आहेत. दर्जेदार द्राक्षांची व्यापारी बांधावरूनच खरेदी करतात. पिसाळ यांना एक एकर द्राक्ष शेतीसाठी तीन ते साडेतीन लाख खर्च करावा लागतो. तर खर्च वजा जाता एकरी जवळपास 10 लाखांचा नफा मिळत आहे.
advertisement
advertisement
सेंद्रिय खतांच्या प्रभावी वापरातून दर्जेदार द्राक्ष उत्पादित करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अकरा वर्षांपासून द्राक्ष निर्यात करत आहेत. पिसाळ बंधूंनी अनेक संकटांना एकजुटीने तोंड देत मेहनत आणि निष्ठेने चार दशकांपासून द्राक्ष शेतीत सातत्य ठेवले आहे. मोठ्या कष्टातून संपूर्ण कुटुंबाने मातीत राबत 22 एकर खडकाळ माळावर द्राक्षबागा फुलवत चाळीसहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे. बदलत्या वातावरणातही धाडसाने द्राक्षशेती करत पिसाळ कुटुंबाने जीवापाड कष्ट करून पिकवलेली निर्यातक्षम द्राक्षशेती अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरते आहे.