Weather Update: मुंबईचा पारा 20 च्या खाली, कोकणात थंडीचा कडाका, आजचं हवामान अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत असून कोकणात देखील गारठा वाढला आहे. मुंबई-ठाण्यातील अपडेट जाणून घेऊ.
राज्यात नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पावसाळा अखेर संपला असून हिवाळा सुरू झाला आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा काळ सुरू झाला असून तापमानात घट होत आहे. हवामान विभागाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे असून सकाळ-संध्याकाळच्या वेळेत गारवा वाढला आहे.
advertisement
मुंबईत आकाश निरभ्र असून सकाळी हलकी थंडी आणि संध्याकाळी गारवा जाणवू लागला आहे. दिवसा तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असले तरी सकाळी तापमान 20 अंशांच्या खाली जाते. समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्यामुळे उकाडा थोडा कमी झाला आहे. मुंबईत हवी तशी थंडी अद्याप सुरू नसली तरी वातावरणात थंडीतल्या सुरुवातीची चाहूल स्पष्टपणे जाणवते.
advertisement
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. दिवसभर ऊन असले तरी रात्रीच्या वेळी तापमान झपाट्याने खाली येत आहे. सकाळच्या वेळी धुक्याची चादर दिसू लागली असून, नागरिकांना आता बाहेर पडताना थंडी वाजू लागली आहे. हवामान विभागाने या भागात पुढील काही दिवस स्वच्छ आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
कोकण किनाऱ्यावरचा पाऊस आता पूर्णपणे थांबला आहे. रायगडपासून ते सिंधुदुर्गपर्यंतचा परिसर कोरड्या आणि स्वच्छ हवामानाने न्हाऊन निघाला आहे. सकाळ-संध्याकाळी थंड वारे वाहत असून, ग्रामीण भागात वातावरणात गारवा पसरला आहे. रत्नागिरी आणि देवगड किनाऱ्यावर तापमान 20 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.










