Mumbai Rain: छत्री सोबत ठेवा! पुढील 24 तास पावसाचे, मुंबई, ठाण्याला सतर्कतेचा इशारा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, ठाण्यात देखील आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात मान्सूनचा जोर कायम असून कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. आज, 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व संपूर्ण कोकण विभागात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून दमट वातावरण जाणवणार आहे.
advertisement
मुंबईत आठवड्याची सुरुवात मध्यम स्वरूपाच्या पावसाने झालीये. तर आजही सकाळपासूनच मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश पूर्णतः ढगाळ राहणार असून, काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. या काळात तापमानाचा पारा 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रता वाढलेली जाणवेल.
advertisement
आज 8 जुलै रोजी ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल.. सकाळपासून आकाशात ढग दाटलेले असून काही भागांत रिमझिम पावसास सुरुवात झाली आहे. दुपारनंतर काही भागांत विजांचा कडकडाटाट जोरदार सरींची शक्यता आहे. तापमान सुमारे 29 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आर्द्रतेमुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊनच बाहेर पडावे.
advertisement
पालघरमध्ये आठवड्याची सुरुवात अतिवृष्टीने झाली असून रेडअलर्ट देण्यात आला होता. आज जिल्ह्यात डहाणू, वसई, तलासरी व जव्हार परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असला तरी काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
कोकणातील वातावरण पूर्णतः ढगाळ असून, सकाळपासूनच रत्नागिरी, रायगड, व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडत आहेत. हवामान विभागानुसार, दिवसभर पावसाचे प्रमाण मध्यम राहील, तर काही भागांत संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.