Mumbai Rain: श्रावणात वारं फिरलं, मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: श्रावणात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणसह मुंबईतील पावसाचा जोर ओसरला आहे.
श्रावण महिना सुरू झाला असून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. मात्र, आता हवामानात बदल होत असून पाऊस घटला आहे. 30 जुलै रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबईत मागील काही दिवस मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा उष्मा जाणवू लागलाय. हवामान विभागानुसार, मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सऱ्या आज पडू शकतात. कमाल तापमान 31 अंश सेल्सियस तर किमान तापमान 25 अंश सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा जास्त राहील. काही भागांत रिमझिम पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांनी छत्री जवळ ठेवावी.
advertisement
नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये देखील आज मध्यम स्वरूपाच्या सऱ्या पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वातावरण ढगाळ असून दुपारी व सायंकाळी हलक्याफुलक्या सऱ्यांमुळे थोडा दिलासा मिळेल. तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. नवी मुंबईत 30 अंशांची कमाल तर 25 अंशांची किमान तापमानाची नोंद अपेक्षित आहे, आणि ठाण्यातही हेच प्रमाण राहील.
advertisement
advertisement
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने सातत्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र आज, 30 जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरीला यलो अलर्ट दिला आहे. तर सिंधुदुर्गात कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही. हवामान तुलनेने स्थिर असून हलक्या सरींची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी असून वातावरण ढगाळ आणि दमट राहण्याची शक्यता आहे.











