Toll Naka Rules : 'या' वाहानांना टोलनाक्यावर भरावा लागत नाही Toll, काय आहेत NHAI चे नियम?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यामध्ये देशातील काही ठरावीक व्यक्तींना टोलमाफी दिली जाते. आता तुम्हाला नक्की उत्सुकता असेल की असे कोण लोक आहेत ज्यांना टोलमाफी दिली जाते? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
भारतामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस-वेचे जाळे झपाट्याने वाढत आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी आणि देखभालीसाठी सरकारकडून टोल कर आकारला जातो. महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना ठराविक ठिकाणी उभारलेल्या टोल प्लाझावर थांबून शुल्क द्यावे लागते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी टोल संदर्भात काही कडक नियम घालून दिलेले आहेत आणि सामान्यतः सर्व प्रकारच्या वाहनांना इथे टोल भरणे बंधनकारक असते.
advertisement
advertisement
देशातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, आपत्कालीन सेवा आणि सन्माननीय पुरस्कारप्राप्त व्यक्तींना टोल करातून पूर्ण सूट दिलेली आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, तसेच लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्यासारख्या उच्च पदस्थ व्यक्तींना टोल माफी मिळते. याचप्रमाणे संसद सदस्य, राज्य विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य, तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री यांनाही टोल कर भरण्याची आवश्यकता नसते. शासनाच्या कामकाजाशी संबंधित प्रवास करणाऱ्या अशा मान्यवरांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
advertisement
न्यायव्यवस्थेतही अशाच प्रकारची सवलत दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती व न्यायाधीश यांनाही टोल करातून सूट मिळते. त्याचप्रमाणे, देशाच्या सुरक्षेशी संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दलांना, भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना अधिकारी, अर्धसैनिक दल आणि पोलिस दलातील वर्दीतील अधिकारी यांनाही हीच टोल माफी लागू होते.
advertisement
आपत्कालीन सेवांची गरज लक्षात घेता अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका टोलमुक्त ठेवण्यात आलेली आहेत. हे वाहन नेहमीच तातडीच्या सेवांसाठी धावत असतात, त्यामुळे त्यांचा वेळ टोल प्लाझावर वाया जाऊ नये हा उद्देश आहे. याशिवाय, राष्ट्रासाठी शौर्य आणि पराक्रम सिद्ध केलेल्या परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांना देखील टोल कर भरण्यातून सवलत दिलेली आहे. मात्र अशा व्यक्तींनी टोल प्लाझावर प्रवास करताना आपले फोटोयुक्त ओळखपत्र दाखवणे आवश्यक असते.
advertisement
advertisement
एकंदरीत पाहता, देशातील बहुतांश वाहनांना महामार्गावर प्रवास करताना टोल कर द्यावा लागतो. मात्र राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींना, न्याय आणि सुरक्षा यंत्रणेला, आपत्कालीन सेवांना आणि शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींना टोलमुक्त ठेवण्यात आलेले आहे. या नियमांमुळे ज्या घटकांची भूमिका सार्वजनिक जीवनात अत्यावश्यक आहे त्यांना सुलभता उपलब्ध होते आणि ते कोणत्याही अडथळ्याविना आपली सेवा देऊ शकतात.