यंदा महाराष्ट्रात कुणाचं सरकार? जनता एकालाही देणार नाही बहुमत, राजकीय विश्लेषक असं का म्हणाले?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वजण विजयाचे आडाखे बांधत आहेत. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनीही आपलं मत नोंदवलं आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य सामना होणार असला तरी तिसरी आघाडी आणि अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. सर्वजण आपआपल्या परीने विजयाचे आडाखे बांधत आहेत. ज्य़ेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी मात्र लोकल18 सोबत बोलताना वेगळाच अंदाज वर्तवला आहे.
advertisement
सध्याला महाराष्ट्रातलं राजकारण हे एखाद्या परीकथेसारखं झालेलं आहे. राजकारणात अनेक बदल हे झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण राजकीय चित्र बघता महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता येणे सद्यस्थितीमध्ये तरी शक्य नाहीये. कारण यावेळी शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचे देखील दोन गट झालेले आहेत. यामुळे सध्याला लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आपण कोणाला मत द्यावं. जेणेकरून आपला विकास होईल. त्यामुळे सध्या मतदार देखील संभ्रमात असल्याचं डोळे सांगतात.
advertisement
सर्वच राजकीय नेते पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण याच गोष्टींवरती बोलतात. या अगदी मूलभूत गोष्टी आहेत. या गोष्टींवर बोलण्याबरोबरच विकासाचे मुद्दे आहेत किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याबाबत कुठलाच राजकीय पक्ष किंवा त्यातील नेते बोलत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत. याबाबत कुणीही बोलत नाही. प्रत्येक पक्षाच्या घोषणा पत्रात फक्त लोकप्रिय घोषणा आहेत, असं डोळे म्हणतात.
advertisement
सध्या राजकीय पक्षांच्या योजनात लाडकी बहीण योजनेला पैसे देतो. त्याची रक्कम 1500 वरून 2100 करतो अशीच आश्वासने दिली जात आहेत. परंतु, मुलगी जन्माला आली म्हणून तिला पैसे दिले जाणार आहेत का? भावनिक प्रश्नांतून पैशांची देवाण-घेवाण करणार असाल तर कायदा काय चालवणार आहात? असे सवाल डोळे करतात. तसेच अशा घोषणांपेक्षा रोजगाराच्या संधी आणि मूलभूत प्रश्नांबाबत राजकीय पक्ष आणि नेत्यांनी बोललं पाहिजे, असंही ज्येष्ठ पत्रकार डोळे सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 13, 2024 10:48 PM IST
मराठी बातम्या/Politics/
यंदा महाराष्ट्रात कुणाचं सरकार? जनता एकालाही देणार नाही बहुमत, राजकीय विश्लेषक असं का म्हणाले?







