Pune : मेडिकल चेकअपमध्ये निघाला कॅन्सर, पुण्याच्या IT कंपनीने नोकरीवरूनच काढलं, कर्मचाऱ्यावर आंदोलनाची वेळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुण्यातील येरवडा भागातल्या कॉमर्स झोनमधील एका आयटी कंपनीने कॅन्सरग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : पुण्यातील येरवडा भागातल्या कॉमर्स झोनमधील एका आयटी कंपनीने कॅन्सरग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. हा कर्मचारी मागच्या 8 वर्षांपासून SLB नावाच्या मल्टीनॅशनल आयटी कंपनीमध्ये फॅसिलिटी मॅनेजर म्हणून काम करत आहेत. संतोष पटोले, असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कॅन्सरचे उपचार सुरू असतानाच कंपनीने आपल्याला टर्मिनेशन लेटर दिल्याचा दावा संतोष पटोले यांनी केला आहे.
संतोष पटोले यांना या क्षेत्रात 21 वर्षांचा अनुभव आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने केलेल्या वार्षिक आरोग्य तपासणीमध्ये थायरॉईड नोड्यूल इस्थमस कॅन्सर असल्याचं निदान झालं. या रिपोर्टनंतर आपण लगेचच मे आणि जून महिन्यात ऑपरेशन आणि उपचारांसाठी मेडिकल लिव्ह घेतली. जूनपर्यंतच्या उपचारांचा खर्च कंपनीने उचलला. डॉक्टरांनी 1 जुलैला प्रमाणपत्र देऊन कामावर जाण्याची परवानगीही दिली, असं संतोष पटोले यांनी सांगितलं आहे.
advertisement
आपण जुलै महिन्यात कामावर परतण्याची तयारी करत असतानाच 23 जुलैला कंपनीने आपल्याला अचानक काढून टाकल्याचं पत्र दिलं, यामुळे आपली नोकरी तर गेली, पण पुढच्या महागड्या उपचारांचा खर्च कोण करणार? असा प्रश्नही निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संतोष पटोले यांनी दिली आहे. एका प्रोजेक्टमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे 2.5 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं कारण देत कंपनीने आपल्याला काढल्याचा दावा संतोष यांनी केला आहे, पण कंपनीचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचंही संतोष म्हणाले आहेत. संबंधित प्रोजेक्ट अद्याप अंमलातच आला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
'कंपनीने कोणताही युक्तीवाद ऐकण्यास नकार दिला तसंच आजारपणात आपल्याला कामावरून काढून टाकलं. तेव्हापासून उपचार करणं आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. आता रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेणंही कंपनीने थांबवलं आहे, त्यामुळे आपल्यावर मानसिक आणि आर्थिक तणाव वाढला आहे', असंही संतोष पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान एसएलबी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे माध्यमांनी प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला, पण कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं वृत्त आज तक ने दिलं आहे. कंपनीवर होत असलेल्या आरोपांमुळे कामगार विभाग आणि मानवाधिकार संघटनांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : मेडिकल चेकअपमध्ये निघाला कॅन्सर, पुण्याच्या IT कंपनीने नोकरीवरूनच काढलं, कर्मचाऱ्यावर आंदोलनाची वेळ!










