गॅस संपला म्हणून ‘ही’ चूक कराल, थेट तुरुंगात जाल, सरकारी विभागाचा इशारा
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू असल्याने जागतिक पातळीवर इंधन आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणे : देशात गॅस व इंधनाच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत असताना काही ठिकाणी चुलीसाठी लाकूड वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर विनापरवाना वृक्षतोड आणि लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे. गॅसटंचाईचे कारण पुढे करून वृक्षतोड केल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करून तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असेही वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू असल्याने जागतिक पातळीवर इंधन आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून एलपीजी, सीएनजी तसेच एमएलएनजी गॅसचा पुरवठा मागणीपेक्षा कमी होत असल्याचे चित्र आहे. याशिवाय कमर्शियल गॅसच्या वाटपावर केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे हॉटेल, खानावळ आणि काही उद्योगांवरही त्याचा परिणाम होत आहे. सिलिंडरचा तुटवडा वाढल्याने काही ठिकाणी काळाबाजारही सुरू झाल्याची चर्चा आहे. परिणामी अनेकजण पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
ही झाडे तोडल्यास थेट कारवाई
चुलीसाठी लाकूड मिळवण्यासाठी संरक्षित प्रजातींची वृक्षतोड केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार साग, हिरडा, महुआ, आंबा, खैर, चंदन, बिजा, हळदू, तिवस, ऐन, किंजळ, अंजन, जांभूळ आणि खारफुटी यांसारख्या वृक्षप्रजाती अनुसूचित समाविष्ट आहेत. या प्रजातींची वृक्षतोड करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा वृक्ष अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
advertisement
शासनाच्या 4 ऑक्टोबर 1999 च्या अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शिशम, शिवण, नाना, बेहळा, काजरा भेडस आणि पांढरा ऐन या प्रजातींचाही अनुसूचित यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 22 प्रकारच्या वृक्षांची विनापरवानगी तोड करण्यास मनाई आहे.
याशिवाय भारतीय वन अधिनियम 1927 नुसार निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, अशोक, शेवगा, सिंदी, ऑरेंज, चिकू, भेंडी, अकेशिया आणि काही बांबू प्रजातींसह काही झाडांच्या लाकडाच्या वाहतुकीसाठी परवानगीची गरज नसली तरी इतर प्रजातींसाठी संबंधित वन अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
advertisement
दरम्यान, विनापरवाना वृक्षतोड केल्यास प्रति वृक्ष 1000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच अवैध लाकूड वाहतूक केल्यास भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत एक वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गॅसटंचाईचे कारण देत नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 10:42 AM IST









