Mumbai-Pune Expressway: 27 तासांचा थरार संपला, टँकरही हटवला; पण 'या' एका कारणामुळे आजही मुंबई-पुणे प्रवास ठरू शकतो डोकेदुखी!
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तब्बल २७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. यामुळे अखेर अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारपासून सुरू असलेला गॅस गळतीचा धोका अखेर टळला आहे. तब्बल २७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. यामुळे अखेर अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.
27 तासांचा थरार अन् यंत्रणांची झुंज
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटल्याने या महामार्गावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. ज्वलनशील गॅसची गळती होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरण्यात आली होती. अग्निशमन दल, एचपीसीएलचे तांत्रिक पथक आणि महामार्ग पोलिसांनी जीवाची बाजी लावून ही गळती रोखली. अखेर २७ तासांनंतर क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला आणि रस्ता सुरक्षित करण्यात आला.
advertisement
हजारो गाड्यांचा 'बॅकलॉग'; संथ गतीने प्रवास
रस्ता मोकळा झाला असला तरी वाहतुकीचे आव्हान अद्याप संपलेले नाही. गेल्या २७ तासांपासून हजारो वाहने घाटात आणि टोल नाक्यांवर अडकून पडली होती. या गाड्या आता टप्प्याटप्प्याने सोडल्या जात आहेत. वाहनांची संख्या प्रचंड असल्याने आणि रस्ता निसरडा असल्याने वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. प्रवाशांना मुंबई किंवा पुण्याला पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.
advertisement
प्रवाशांचे प्रचंड हाल
या २७ तासांच्या काळात प्रवाशांचे अन्न आणि पाण्याविना मोठे हाल झाले. घाटात अडकलेल्या लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या समस्यांनी टोक गाठले होते. जुना महामार्गही वाहनांनी गच्च भरल्याने पर्यायी मार्गही निकामी ठरले होते. आता मार्ग सुरू झाला असला तरी पोलीस प्रशासनाकडून 'लेन कटिंग' न करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 6:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: 27 तासांचा थरार संपला, टँकरही हटवला; पण 'या' एका कारणामुळे आजही मुंबई-पुणे प्रवास ठरू शकतो डोकेदुखी!









