Dagdusheth Ganpati: पहिला मान बाप्पाचा! दगडूशेठ गणपतीला तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची आरास, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Dagdusheth Ganpati: द्राक्ष हंगामाच्या प्रारंभी विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या भावनेतून हा नैवेद्य अर्पण करण्यात येतो.
पुणे : होळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदाही द्राक्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ट्रस्टतर्फे गणरायाला तब्बल दोन हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी गाभारा आणि संपूर्ण सभामंडप सजविण्यात आल्याने मंदिरात आकर्षक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक येथील सह्याद्री फार्म्स कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार द्राक्षांचा या आराशीसाठी वापर करण्यात आला. निर्यातक्षम आणि रसायनमुक्त द्राक्षांची रंगीत सजावट पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. मंदिरातील गाभाऱ्यातील ही देखणी आरास भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
Holi Tradition: धुंड संस्कार अन् हजारो वर्षांची परंपरा, कशी असते बंजारा समाजाची पारंपरिक होळी? Video
advertisement
द्राक्ष हंगामाच्या प्रारंभी विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या भावनेतून हा नैवेद्य अर्पण करण्यात येत असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष हंगामात अशा प्रकारची आरास मंदिरात केली जात आहे. सध्या सह्याद्री फार्म्सशी सुमारे 22 हजार शेतकरी जोडले गेले असून, भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून तिची ओळख आहे. द्राक्षांच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादनही कंपनीकडून करण्यात येते. श्रद्धा, कृषी आणि समाजसेवा यांचा संगम घडवणारा हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे.
advertisement
या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याचा सामाजिक पैलू. गणरायाच्या आराशीनंतर ताजी द्राक्षे प्रसादरूपाने भाविकांना वाटली जाणार आहेत. तसेच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि सेवाभावी संस्थांनाही ही द्राक्षे वितरित करण्यात येणार आहेत. ससून रुग्णालयातील रुग्णांनाही प्रसाद स्वरूपात द्राक्षे देण्यात येणार असल्याने हा महोत्सव केवळ धार्मिक न राहता लोकाभिमुख आणि समाजोपयोगी ठरत आहे.
advertisement
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व मोठे आहे. एकूणच, होळीच्या निमित्ताने साजरा झालेला हा द्राक्ष महोत्सव भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, श्रद्धा आणि समाजसेवेचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 4:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Dagdusheth Ganpati: पहिला मान बाप्पाचा! दगडूशेठ गणपतीला तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची आरास, Video







