Population Day 2025:...तर पुणे राहण्यायोग्य शहर राहणार नाही! धक्कादायक आकडेवारी समोर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Population Day 2025: गेल्या 20 वर्षांत पुण्यात लोकसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र असून शहराची घुसमट होतेय. यासाठी सॅटेलाइट सिटी निर्माण करण्याची मागणी होतेय.
पुणे : सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आज वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे गंभीर सामाजिक आणि नागरी समस्यांना सामोरे जात आहे. गेल्या दोन दशकांत पुण्याचा वेगाने विस्तार झाला असून लाखोच्या संख्येने नागरिक राज्य-परराज्यातून येथे स्थलांतर करत आहेत. या लोकसंख्येच्या वाढीचा परिणाम वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक सुविधांवर जाणवतो आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सजग नागरिक मंच’ संस्थापक विवेक वेलणकर यांनी या विषयावर चिंता व्यक्त करत शहराच्या वाढीव समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, 2006 मध्ये पुणे शहराची लोकसंख्या सुमारे 50-52 लाखांच्या आसपास होती. मात्र, आज ती 72 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 20 वर्षांमध्ये पुणे शहराचा चेहरामोहरा बदलला असून त्याचसोबत समस्याही प्रचंड वाढल्या आहेत.
advertisement
“वाढती लोकसंख्या ही केवळ आकड्यांची वाढ नसून, ती सामाजिक आणि नागरी व्यवस्थांवर होणारा दबावही दर्शवते. पुण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढते आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, प्रदूषणाची पातळी वाढली आहे आणि रस्ते व वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत,” असेही वेलणकर सांगतात.
advertisement
सॅटेलाइट सिटी गरजेची
“वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सॅटेलाइट सिटीज ही गरज बनली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहर वर्टिकली वाढते आहे, जीवघेण्या ठिकाणी झोपडपट्ट्या आणि अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. यासाठी पुण्याच्या आसपास लोणावळा ते शिरूरपर्यंत स्वतंत्र सॅटेलाइट सिटी विकसित करणे गरजेचे आहे. यामुळे मुख्य शहरातील ताण काहीसा कमी होईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल,” असे त्यांनी सांगितले.
advertisement
लोकसंख्या वाढीचे हेही कारण
शहरात समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची संख्या वाढत असून हीदेखील लोकसंख्या वाढीचे एक प्रमुख कारण ठरत आहे. शिक्षण, नोकरी, आरोग्यसेवा आणि राहणीमानाच्या सोयी यासाठी विविध भागांतून नागरिक पुण्यात स्थायिक होत आहेत. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला सामोरे जाण्यासाठी पुणे महापालिकेच्या योजनांचा अभाव जाणवतो, असे ते म्हणतात.
advertisement
सरकारकडे मागणी
विवेक वेलणकर यांनी सरकारकडे सॅटेलाइट टाऊनशिप विकसित करण्याची मागणी केली आहे. “आजच जर या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले गेलं नाही, तर पुढील काही वर्षांत पुणे राहण्यालायक शहर राहणार नाही. डी-सेंट्रलायझेशन हे काळाची गरज असून, आसपासच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांसाठी समतोल सुविधा निर्माण करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असावी,” असे वेलणकर सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 11, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Population Day 2025:...तर पुणे राहण्यायोग्य शहर राहणार नाही! धक्कादायक आकडेवारी समोर