Ekadashi Vrat: कामिका एकादशीला धार्मिक महत्त्व, उपवासाचे हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, उपवास सोडतान काय करावं?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ekadashi Vrat: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी शेवटची एकादशी म्हणून कामिका एकादशीचं महत्त्व पुराणात सांगितलं आहे. एकादशी व्रत, पूजा-विधी आणि उपावस याबाबत जाणून घेऊ.
मुंबई : आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशी यंदा 21 जुलै 2025 रोजी म्हणजेच सोमवारी आहे. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असून, उपवास व भक्तिभावाने याचे व्रत केल्यास पापक्षय, पुण्यप्राप्ती आणि मोक्षसिद्धी प्राप्त होते, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. विशेष म्हणजे, ही एकादशी श्रावणाच्या आधीची शेवटची एकादशी असल्यामुळेही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या एकादशीनिमित्त श्री विष्णूची पूजा, आराधना व उपवास का करावा तसंच उपवास करताना आणि उपवास सोडताना कोणत्या चुका टाळाव्या याबद्दल आदित्य जोशी गुरुजी, बोरिवली यांनी मार्गदर्शन केलं आहे.
व्रत व पूजन कसे करावे?
घरातील पूजास्थानात भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून तुळशीपत्र, पंचामृत, गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींनी पूजा करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप, श्रीमद्भगवद्गीतेचे पाठ, आणि हरिनाम संकीर्तन करणे अत्यंत शुभ मानले जाते. उपवासादरम्यान संपूर्ण दिवस शांतपणे, सात्त्विकतेने व्यतीत करावा. काही जण रात्रभर जागरण करून भजन-कीर्तन करतात. दुसऱ्या दिवशी (22 जुलै) द्वादशीच्या सूर्योदयानंतर योग्य वेळेत पारण (उपवास सोडणे) आवश्यक आहे.
advertisement
उपवास करताना पाळावयाचे नियम
कामिका एकादशीच्या दिवशी उपवास करताना काही नियम पाळणे आवश्यक असते. ज्यांना निर्जल व्रत शक्य असेल, त्यांनी फक्त पाण्यावर उपवास करावा. इतरांनी फलाहार करून व्रत पाळावे. यामध्ये फळं, दूध, गोड बटाट्याचे पदार्थ, राजगिरा, साबुदाणा, कोथिंबीर इत्यादींचा समावेश असतो. धान्य, मीठ, कांदा-लसूण, तांदूळ, मसाले वर्ज्य असतात. व्रताच्या दिवशी शुद्ध शाकाहारी आणि सात्त्विक जीवनशैली, संयम, आणि भक्तीपूर्ण वृत्ती ठेवणे महत्त्वाचे असते.
advertisement
व्रताच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे द्वादशीला (22 जुलै 2025), सूर्योदयानंतर शुभ मुहूर्तात (सकाळी 5:37 ते 7:05) पवित्र स्नान करून भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि त्यानंतर पारण करणे आवश्यक असते. पारण करताना शुद्ध, सात्त्विक अन्नाचे सेवन केले जाते. काही जण फळं किंवा गोडधोड खाऊन उपवास संपवतात, तर काही जण पूर्ण पारंपरिक जेवण करून व्रत सोडतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 21, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ekadashi Vrat: कामिका एकादशीला धार्मिक महत्त्व, उपवासाचे हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, उपवास सोडतान काय करावं?







