अजब! भारताच्या 'या' राज्यात लपलंय चमत्कारिक मंदिर, असं शिवलिंग जे बदलत रंग
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे विज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक अनाकलनीय घटना पाहायला मिळतात. अशाच एका चमत्काराचे केंद्र ठरले आहे राजस्थानमधील धौलपूर.
Colour Changing Shiv Linga : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे विज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक अनाकलनीय घटना पाहायला मिळतात. अशाच एका चमत्काराचे केंद्र ठरले आहे राजस्थानमधील धौलपूर येथील 'अचलेश्वर महादेव' मंदिर. हे मंदिर चंबळ नदीच्या खोऱ्यात वसलेले असून, येथील शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो, हे पाहून भाविक आणि पर्यटक थक्क होतात. या गूढ शिवलिंगाचा रंग का बदलतो, याचे उत्तर शोधण्यात अनेक संशोधक अपयशी ठरले आहेत.
शिवलिंगाचा रंग कसा बदलतो?
अचलेश्वर महादेव मंदिरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शिवलिंगाचे बदलणारे स्वरूप. दिवसातून तब्बल ३ वेळा हे शिवलिंग त्याचे रंग बदलते. पहाटेच्या वेळी शिवलिंगाचा रंग गडद लाल असतो. तर जसा सूर्य डोक्यावर येतो, तसा शिवलिंगाचा रंग बदलून तो केशरी किंवा भगवा होतो आणि सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी हे शिवलिंग गडद काळ्या किंवा सावळ्या रंगात न्हाऊन निघते. जरी काही लोक याला सूर्यकिरणांचा परिणाम मानतात, तरीही अंधाऱ्या गाभाऱ्यात आणि रात्रीच्या वेळी होणारा हा बदल आजही एक मोठे रहस्य आहे.
advertisement
मंदिराची महत्त्वाची आणि रंजक वैशिष्ट्ये
भगवान शिवाच्या अंगठ्याची पूजा: जगात हे एकमेव असे मंदिर मानले जाते, जिथे शिवलिंगाची नाही, तर भगवान शंकराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने आपला अंगठा टेकवून 'अचलगड' पर्वत स्थिर केला होता, म्हणून या मंदिराला 'अचलेश्वर' असे नाव पडले.
शिवलिंगाची अनाकलनीय खोली: असे म्हटले जाते की, एकदा या शिवलिंगाचा शेवट शोधण्यासाठी आजूबाजूला खोदकाम करण्यात आले होते. मात्र, अनेक फूट खोल खोदूनही शिवलिंगाचा अंत सापडला नाही. अखेर वैफल्य येऊन लोकांनी खोदकाम थांबवले.
advertisement
पाताळात जाणारा खड्डा: शिवलिंगाच्या खाली एक नैसर्गिक खड्डा आहे. भाविक येथे कितीही जल अर्पण केले तरी तो खड्डा कधीच भरत नाही. ते पाणी नेमके कुठे जाते, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही.
नंदीचा ऐतिहासिक चमत्कार: मंदिराच्या परिसरात पाच धातूंनी बनलेला एक विशाल नंदी आहे. असे मानले जाते की, जेव्हा मुस्लिम आक्रमकांनी या मंदिरावर हल्ला केला होता, तेव्हा या नंदीच्या मूर्तीतून हजारो मधमाश्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी आक्रमकांना पळवून लावले होते.
advertisement
विवाह जुळण्यासाठी श्रद्धेचे ठिकाण: अशी मान्यता आहे की, ज्या तरुण-तरुणींचे विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी 16 सोमवारी येथे जल अर्पण केल्यास त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो आणि विवाहातील अडथळे दूर होतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 1:49 PM IST








