पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त नागपूरमध्येच साजरा होतो मारबत उत्सव, काय आहे 143 वर्षांची परंपरा?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नागपूरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनोखी मारबत मिरवणूक निघते. या मिरवणुकीला 143 वर्षांची परंपरा आहे.
नागपूर, 15 सप्टेंबर : बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो. विदर्भात पोळा दोन दिवस साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. त्या दिवशी नागपूरमध्ये निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे.
काय आहे मारबत?
'ईडापिडा, रोगराई, महागाई इत्यादी घेऊन जा गे मारबत,' असं म्हणत काळी, पिवळी आणि अनेक बडग्यांच्या रूपाने वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यात येते. संपूर्ण शहरातून वाजत-गाजत या मिरवणूका निघतात. यंदा पिवळ्या मारबतीला 139 वर्ष पूर्ण होत आहे तर काळी मारबतीला 143 वर्ष पूर्ण होत आहे. मोठ्या उत्साहाने साजरा होणारा जगातील एकमेव मारबत बघण्यासाठी केवळ विदर्भातून नव्हे तर देशाच्या काना-कोपऱ्यातून लोक नागपूरात दाखल होत असतात.
advertisement
मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते.
advertisement
काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते.
advertisement
श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक निघते. या काळात शेतीची बहुतेक कामं झाली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडे वेळ असतो. त्यांच्यासाठी ही मिरवणूक एक विरंगुळा आहे, अशी माहिती मारबत समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी जयदीप तकीदकर यांनी दिली.
'पूर्वीच्या काळी मारबतची मिरवणूक घेऊन जाताना तिची धिंड काढली जात होती. त्यावेळी थट्टा करणे, मजाक मस्करीत तिच विसर्जन व्हायचे. हळूहळू मारबतीचं रूप बदलत गेले. लोकांची याकडं पाहण्याची दृष्टी बदलली. मारबत बनवून तयार झाली की भाविक रात्रीपासूनच तिच्या समोर आपली समस्या मनोभावे मांडू लागले.
advertisement
पूजा, अर्चा, ओटी भरणे, नवस बोलणे यासारख्या वेगवेगळ्या प्रकारांनी मारबतीची प्रचीती लोकांना येवू लागली. भाविकांना कोर्ट कचेरी, व्यवसायामधील समस्या दूर होऊन फायदा होऊ लागला. या पद्धतीनं सुरुवातीला विरंगुळा म्हणून असलेले मारबत नागपूरकरांचे श्रद्धास्थान बनले,' अशी माहिती ताकीदकर यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 15, 2023 9:06 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त नागपूरमध्येच साजरा होतो मारबत उत्सव, काय आहे 143 वर्षांची परंपरा?