Mumbai Cricket : मुंबई क्रिकेटमध्ये उलथापालथ! रोहितच्या आग्रहानंतर यशस्वी रिटर्न, पण आता रहाणेने घेतला मोठा निर्णय
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यावेळचा रणजी ट्रॉफी सिझन खेळणार आहे, पण रहाणेने घेतलेल्या एका निर्णयामुळे मुंबई क्रिकेटमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन्सीचा राजीनामा दिला असला तरी आपण हा रणजी हंगाम खेळणार असल्याचं अजिंक्य रहाणेने स्पष्ट केलं आहे. याशिवाय चेतेश्वर पुजारानेही रणजी ट्रॉफीच्या निवडीसाठी आपण उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. चेतेश्वर पुजारा सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पुजाराने तो उपलब्ध असल्याचं आम्हाला कळवलं आहे, आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण त्याचा अनुभव टीमला फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
यशस्वी परत आला, रहाणेने कॅप्टन्सी सोडली
मुंबई क्रिकेट आता तरुण खेळाडूच्या हातात द्यायची गरज आहे, त्यामुळे आपण मुंबईचं कर्णधारपद सोडत असल्याचं रहाणेने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता, यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसीही घेतली होती, पण रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला गोव्याला जाण्यापासून रोखलं त्यामुळे जयस्वालने मुंबईसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. रहाणेसोबत जयस्वालचे वाद झाल्यामुळे त्याने मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याची वृत्तही तेव्हा प्रसिद्ध झाली होती.
advertisement
अजिंक्य रहाणेने 25 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 26 टी-20 सामन्यांमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने 2023-24 च्या मोसमात 42व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. याशिवाय 2022-23 साली मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, त्या टीमचं नेतृत्वही अजिंक्य रहाणेने केलं होतं. यानंतर मागच्या मोसमातही मुंबईने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजय मिळवला, तेव्हा रहाणेने 164.56 च्या स्ट्राईक रेटने 469 रन केले, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय रहाणेने 3 वनडे, टी-20 आणि 6 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यात ऑस्ट्रेलियात मेलबर्न आणि गाब्बामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांचा समावेश आहे.
advertisement
पुजाराही रणजी खेळणार
37 वर्षांचा चेतेश्वर पुजारा भारताकडून 103 टेस्ट मॅच खेळला आहे, पण मागच्या काही दिवसांपासून त्याला भारतीय टेस्ट टीममध्ये संधी मिळत नाहीये. 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर पुजाराची भारतीय टीममध्ये निवड झाली नाही. मागच्या रणजी ट्रॉफी मोसमात पुजाराने 7 सामन्यांमध्ये 40.2 च्या सरासरीने एक शतक आणि एक अर्धशतक केलं. मागच्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली होती, पण गुजरातने त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं.
advertisement
दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची निवड झालेली नाही. तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी पुजारा-रहाणेची दुलीप ट्रॉफीच्या टीममध्ये निवड झाली नसल्याचं निवड समितीकडून सांगण्यात आलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Cricket : मुंबई क्रिकेटमध्ये उलथापालथ! रोहितच्या आग्रहानंतर यशस्वी रिटर्न, पण आता रहाणेने घेतला मोठा निर्णय