T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानची पुढची मॅच कधी आणि कुठे होणार? असे आहे समीकरण
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IND vs PAK: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा संभाव्य महामुकाबल्याची उत्सुकता वाढली आहे. सुपर 8 आणि उपांत्य फेरीतील निकालांवर भारत-पाकिस्तान दुसऱ्यांदा भिडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडिया दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यांत भारताने प्रतिस्पर्ध्यांना एकतर्फी पराभूत केले आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना सर्वाधिक चर्चेत होता, पण त्या लढतीतही भारताने वरचष्मा राखत विजय मिळवला. आता सुपर 8 फेरी निश्चित झाल्यानंतर एक मोठा प्रश्न चर्चेत आला आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांची या स्पर्धेत पुन्हा एकदा गाठ पडू शकते का?
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये होते. त्यामुळे सुपर 8 टप्प्यात त्यांची पुन्हा लढत होण्याची शक्यता नाही. मात्र दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत (सेमीफायनल) प्रवेश मिळवला, तर दुसऱ्या सामन्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासाठी सुपर 8 मध्ये पात्र ठरलेल्या संघांची रचना समजून घेणे आवश्यक आहे.
सुपर 8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत.
G1 प्री-सीडिंग: झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत
advertisement
G2 प्री-सीडिंग: न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान
प्रत्येक गटातील संघ इतर तिन्ही संघांविरुद्ध सामने खेळतील. या सामन्यांच्या निकालांवरून प्रत्येक गटातील अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरेल. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
स्पर्धेच्या स्वरूपानुसार G1 गटातील अव्वल संघाचा सामना G2 गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी उपांत्य फेरीत होईल. तसेच G1 मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ G2 मधील अव्वल संघाशी भिडेल. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांची पुन्हा गाठ पडण्यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या गटातून उपांत्य फेरी गाठणे आवश्यक आहे. त्यापैकी एक संघ आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आणि दुसरा दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर उपांत्य फेरीत त्यांची थेट टक्कर होऊ शकते. या परिस्थितीत ही लढत श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.
advertisement
जर दोन्ही संघांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले किंवा दोघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर त्यांना उपांत्य फेरीत वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळावे लागेल. मात्र त्या दोघांनीही आपापले उपांत्य सामने जिंकले, तर अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत अंतिम सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. कारण दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील पूर्वीच्या करारानुसार पाकिस्तान संघ भारतात खेळण्यासाठी प्रवास करणार नाही. त्यामुळे संभाव्य भारत-पाकिस्तान अंतिम सामना तटस्थ स्थळी होण्याची शक्यता आहे.
advertisement
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी लढत अशक्य नाही; मात्र त्यासाठी दोन्ही संघांनी सुपर 8 आणि उपांत्य फेरीतील अडथळे पार करणे गरजेचे आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही शक्यता रोमांचक असून, पुढील सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 6:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानची पुढची मॅच कधी आणि कुठे होणार? असे आहे समीकरण










