IPL 2026 : 'इथून पुढे फक्त...', CSK च्या पहिल्याच पराभवानंतर ऋतुराजचे वार, दोघांना धरलं जबाबदार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला आहे. चेन्नईने दिलेलं 128 रनचं आव्हान राजस्थान रॉयल्सने फक्त 12.1 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पार केलं.
गुवाहाटी : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला आहे. चेन्नईने दिलेलं 128 रनचं आव्हान राजस्थान रॉयल्सने फक्त 12.1 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पार केलं. वैभव सूर्यवंशीने 17 बॉलमध्ये 305.88 च्या स्ट्राईक रेटने 52 रन केल्या, यात 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. याशिवाय यशस्वी जयस्वालने नाबाद 38 आणि रियान परागने नाबाद 14 रन करून राजस्थानचा विजय निश्चित केला.
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानच्या बॉलर्सनी सुरूवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले. पॉवर प्लेमध्येच चेन्नईने त्यांच्या 4 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जेमी ओव्हरटनने 43 रनची खेळी केली, त्यामुळे चेन्नईला 100 रन तरी गाठता आले. राजस्थानकडून नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या तर ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिष्णोई यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
काय म्हणाला कर्णधार ऋतुराज गायकवाड?
चेन्नई सुपरकिंग्सच्या या पराभवाला कर्णधार ऋतुराज गायकवाड याने दोघांना जबाबदार धरलं आहे. राजस्थानचे फास्ट बॉलर नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर यांची नाव ऋतुराज गायकवाडने घेतली आहेत. 'पराभव झाला असला तरी फारसा निराश नाही. खेळपट्टी सुरुवातीला खूपच कठीण होती. खास करून जोफ्रा आर्चर आणि बर्गर यांचा सामना करताना अडचणी येत होत्या, त्यांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग केली. मीडियम फास्ट बॉलर आणि स्पिनरनाही खेळणं कठीण जात होतं', असं ऋतुराज गायकवाड म्हणाला आहे.
advertisement
'आम्ही बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकलो असतो. मॅच शेवटपर्यंत नेऊ शकलो असतो. थोडी बॅटिंग दाखवली असती तर स्कोअर 150-160 पर्यंत नेता आला असता, पण आजकाल चांगला स्कोअर किती हे कळत नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त खेळत राहावं लागतं', अशी प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाडने दिली आहे.
इथून पुढे फक्त सुधारणाच होईल
'3 दिवसांनी आमचा पुढचा सामना आहे, प्रत्येकजण चांगल्या मानसिकतेत आहे याची खात्री करावी लागते. टीममध्ये बरेच खेळाडू तरुण आहेत. चुकांसह सुरूवात करणे चांगले आहे. इथून पुढे फक्त सुधारणाच होईल', असं वक्तव्य ऋतुराज गायकवाडने केलं आहे.
advertisement
'इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे कोणता स्कोअर चांगला हे नक्की कळत नाही. तुम्ही 150-160-170 रनचा बचाव करत असता तेव्हा मॅच 20व्या ओव्हरपर्यंत जाईल असं होत नाहीये. आम्ही बॅटिंगमध्ये आणखी चांगले होऊ शकतो', असं ऋतुराज म्हणाला.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
Mar 30, 2026 11:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'इथून पुढे फक्त...', CSK च्या पहिल्याच पराभवानंतर ऋतुराजचे वार, दोघांना धरलं जबाबदार!









