Shahapur Accident : ज्या दिवशी पडणार होत्या अक्षता त्याच दिवशीच दशक्रिया, कार अपघातात तरुण जागीच ठार
Last Updated:
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यातील एका तरुणाचे लवकर लग्नही होणार होते. परंतु या घटनेन त्याच्या लग्नाच्या दिवशी दशक्रिया करण्याची वेळ आली.
शहापूर : ज्या दिवशी अक्षता पडणार होत्या त्या दिवशीच तरुणाचा दशक्रिया विधी करावा लागणार आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना शहापूर तालुक्यातील आटगावाजवळ घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्यू पावलेल्यांपैकी जयेश शेंडे हा घरातील एकुलता मुलगा होता. त्याच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. कुटुंबाने त्याच्यावर मोठ्या आशा ठेवलेल्या होत्या, परंतु या अचानक झालेल्या दुर्घटनेने त्यांच्या आयुष्यात काळोख पसरला आहे.
लग्नाऐवजी तरुणाच्या स्मशानयात्रेची तयारी
दुसरा मृत्यू पावलेला तरुण मयूरेश चौधरी याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. त्याचे लग्न 2 डिसेंबर रोजी ठरले होते. घरात आनंदी वातावरण होते. लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली होती. नातेवाईकांना लग्नाची पत्रिकादेखील वाटली होती. कुटुंबीय लग्नाच्या आनंदात मग्न होते आणि मोठ्या उत्साहाने सर्व तयारी करत होते.
advertisement
मात्र नियतीने वेगळेच चित्र दाखवले. अचानक झालेल्या या अपघातात मयूरेशचा मृत्यू झाला आणि कुटुंबाचा आनंद एका क्षणात दु:खात बदलून गेला. ज्या दिवशी त्याच्या घरात लग्नानिमित्त मंगलाष्टके होणार होती, त्याच दिवशी आता दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे. या भीषण अपघातामुळे दोन तरुणांचे आयुष्य संपले आणि दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shahapur Accident : ज्या दिवशी पडणार होत्या अक्षता त्याच दिवशीच दशक्रिया, कार अपघातात तरुण जागीच ठार


