वसई-विरारची वाहतूक कोंडी सुटणार, चार ठिकाणी मेगा प्लॅन तयार
Last Updated:
Virar–Nalasopara Railway Flyover : वसई-विरारमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विरार आणि नालासोपारा येथील दोन रेल्वे उड्डाणपुलांसाठी एमएमआरडीएकडून 563 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होणार आहे.
वसई : वसई-विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. यापैकी विरारमधील विराटनगर आणि नालासोपारा येथील ओसवालनगरी या ठिकाणच्या रेल्वे उड्डाणपुलांच्या कामासाठी एमएमआरडीएकडून 563 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन उड्डाणपुलांचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रफळ सुमारे 380 चौरस किलोमीटर इतके असून येथे जवळपास 25 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र रस्त्यांची क्षमता मर्यादित असल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतहा शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गांवर कोंडीची समस्या अधिक जास्त आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करून एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळमान (वसई), आचोळे, अलकापुरी (नालासोपारा) आणि विराटनगर (विरार) या चार उड्डाणपुलांचा समावेश होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्वेकडून मंजुरीही मिळाली होती.
advertisement
मात्र अलकापुरी आणि उमेळमान येथील पुलांसाठी आवश्यक जमीन खासगी, सरकारी आणि मिठागर क्षेत्रात येत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सध्या विराटनगर आणि ओसवालनगरी येथे जमीन उपलब्ध असल्याने या दोन उड्डाणपुलांच्या कामाला निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर विरार आणि नालासोपारा परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 11:38 AM IST










