रशियाने मोठा डाव टाकला, चीनला सोबत घेऊन सुरू आहे खतरनाक गेमप्लान; भारताला दिला इशारा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Russia: रशियाने भारत-चीन-रशिया (RIC) त्रिकोण पुन्हा सक्रिय करण्याचा प्रस्ताव ठेवत जागतिक राजकारणात मोठा डाव टाकला आहे. नाटो आणि क्वाडवर थेट हल्ला करत लावरोव यांनी पश्चिमी शक्तींविरोधात नवा आघाडीचा इशारा दिला आहे.
मॉस्को: रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात एक मोठा डाव टाकला आहे. त्यांनी भारत, रशिया आणि चीन (RIC) या त्रिकोणीय सहकार्याला पुन्हा सक्रिय करण्याचे आवाहन केले आहे. पर्म शहरात गुरुवारी झालेल्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरण विषयक परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांनी सीमा तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे RIC गट पुन्हा उभा करण्याची हीच योग्य वेळ आहे.
लावरोव यांच्या या विधानामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य शक्तींना एक मजबूत विरोधी गट उभा करण्याचा स्पष्ट उद्देश दिसतो. त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की RIC हा गट पुन्हा सक्रिय झाला. तर तो पश्चिमी प्रभावांना समोरासमोर टक्कर देऊ शकतो. हे विधान अशा काळात आले आहे. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर “आगेशी खेळतोय” असे वक्तव्य करून सर्वांना धक्का दिला होता.
advertisement
क्वाडवर टीका, भारताला इशारा
लावरोव यांनी क्वाड गटावर (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, क्वाड देश आर्थिक आणि व्यापार सहकार्याच्या नावाखाली चीनविरोधी लष्करी हालचाली करत आहेत. त्यांनी भारताला सूचक इशारा देत असेही सांगितले की, माझा विश्वास आहे की आमचे भारतीय मित्र क्वाडच्या या उकसवणाऱ्या खेळी समजून घेत असतील. हे सर्व चीनविरोधातील कटाचा भाग आहे.
advertisement
RIC पुन्हा सुरू करणे शक्य?
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील RIC गटाची सुरुवात 2006 साली झाली होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, चीनचे हू जिंताओ आणि पुतिन यांनी मिळून या गटाला प्रारंभ केला होता. पुढे हाच गट ब्रिक्ससाठी आधार ठरला. मात्र 2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंध ताणले गेले आणि RIC थांबले.
advertisement
दरम्यान चीनकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे भारतासाठी या त्रिकोणात पुन्हा सामील होणे हे सहज शक्य दिसत नाही. पाकिस्तानला पाचव्या पिढीची फायटर जेट्स देण्याचा चीनचा विचार भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
भारताची संतुलनाची रणनीती
लावरोव यांच्या विधानांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, रशिया पुन्हा चीनकडे झुकला आहे. पण भारत याकडे संतुलन राखत आहे. 1 ते 3 जून दरम्यान भारत युरोपीय संघासोबत हिंद महासागरात नौदल सराव करणार आहे. हा सराव सागरी चाचपणी, युद्धकौशल्य आणि संप्रेषण क्षमता वाढवण्यावर केंद्रित आहे. युरोपियन युनियनने याला "मुक्त आणि नियमाधारित सागरी व्यवस्था" म्हणून वर्णन केले आहे. मात्र रशियाला भारताचे हे पश्चिमाशी वाढते संबंध आपल्यासाठी धोका वाटत आहेत.
advertisement
चीन-पाकिस्तान समीकरण
लावरोव RIC पुन्हा सुरू करण्याची मागणी करत असले, तरी भारताला हेही ठाऊक आहे की चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवतो आहे आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचतो आहे. त्यामुळे भारतासाठी मोठा प्रश्न असा आहे — तो अशा गटाचा भाग कसा होऊ शकतो. जिथे त्याच्या विरोधकाला (पाकिस्तानला) चीन पाठिंबा देत आहे?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 6:11 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
रशियाने मोठा डाव टाकला, चीनला सोबत घेऊन सुरू आहे खतरनाक गेमप्लान; भारताला दिला इशारा