याला म्हणतात जिद्द! नातवंडांसह आजी शिकतेय इयत्ता पहिलीत, बाराखडीपासून सुरुवात
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'मला मूळ अभ्यास येतोय मग तो कशाला शिकायचा', असं न म्हणता त्यांनी शाळेत अगदी बाराखडी आणि आपलं नाव लिहायला शिकण्यापासून शिक्षणाची अत्यंत नम्रपणे सुरुवात केली आहे.
हिमांशू जोशी, प्रतिनिधी
पिथोरागड, 11 डिसेंबर : मुलं शाळेत जात असली, ट्युशनला जात असली, तरी पालक घरी त्यांचा अभ्यास घेतातच. मोठी भावंडंही आपल्या लहान भावंडांना विविध विषय शिकवतात. परंतु आपण लहानपणी कधीतरी आपल्या आईला किंवा आजीला अक्षर ओळख करून दिल्याचं तुम्हाला आठवतंय का? यात चूक किंवा शरम वाटण्यासारखं काही नाहीये. आईला, आजीला परिस्थितीमुळे शाळेत जाता आलं नसलं, तर आपण आता त्यांना अभ्यास शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. शिवाय शिक्षणाला कोणतंही वय नसतं, हेदेखील खरंच आहे की. 61 वर्षीय चंतरा देवी यांनी तर हे वाक्य तंतोतंत खरं करून दाखवलंय. आपल्या नातवंडांसह त्या शाळेत जाऊ लागल्या आहेत.
advertisement
चंतरा देवी यांना आपल्या या नव्या विद्यार्थी जीवनाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी जेव्हा जेव्हा माझ्या नातवंडांना शाळेत सोडायला जायचे, तेव्हा तेव्हा मला आपणही शाळेत प्रवेश घेऊन दररोज वर्गात बसून शिकावं, असं वाटायचं. याबाबत मी इतर पालकांसोबत बोलायचे. हळूहळू माझी ही इच्छा शिक्षकांपर्यंत पोहोचली. तेव्हा त्यांनी स्वतः मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. अखेर मी ठरवलंच की, आता शाळेत जायचं आणि मग इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला.'
advertisement
योग शिकायला आली अन् भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडली, जर्मनीची स्टीना झाली रोविता, घेतला मोठा निर्णय
चंतरा देवी या उत्तराखंडच्या पिथोरागडला लागूनच असलेल्या नेपाळच्या बैतडी भागातील पाटण नगरपालिकेत राहतात. त्यांचं कौतुक यासाठी की, त्यांना काहीच लिहिता, वाचता येत नव्हतं असं नाही. परंतु तरीही 'मला मूळ अभ्यास येतोय मग तो कशाला शिकायचा', असं न म्हणता त्यांनी शाळेत अगदी बाराखडी आणि आपलं नाव लिहायला शिकण्यापासून शिक्षणाची अत्यंत नम्रपणे सुरुवात केली आहे. कविता वाचनासह लहान मुलांच्या विविध उपक्रमांमध्येही त्या आवडीने सहभागी होतात. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेकडून त्यांच्यासाठीदेखील वह्या-पुस्तकं, पेन-पेन्सिल, बॅग आणि जेवणाच्या डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
61 वर्षीय चंतरा देवी यांची शिक्षणाची आवड ही इतरांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आहे. विशेषतः एकदा नापास झाल्यावर शाळा सोडणाऱ्या किंवा काही वर्षांचा गॅप पडला म्हणून शिक्षणच सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चंतरा देवी या आदर्श आहेत. शिक्षणाअभावी आयुष्यात आलेल्या अडचणींमुळेच त्यांनी मनात अजिबात कोणताही संकोच न ठेवता आता शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. यावरून जगण्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा जितका महत्त्वाचा आहे. तितकंच सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेणं आवश्यक आहे.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Pithoragarh,Uttarakhand
First Published :
December 11, 2023 4:27 PM IST