Gatari Amavasya : गटारीला खरंच दारू पिऊन गटारात लोळतात? गटारी म्हणजे नेमकं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gatari Amavasya 2025 : श्रावण सुरू होण्याआधी सगळे ज्या दिवसाची वाट पाहतात ती म्हणजे गटारी. हा दिवस म्हणजे मज्जा, मस्ती आणि भरपेट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण गटारी म्हणजे काय? याचा नेमका अर्थ माहिती आहे का?
नवी दिल्ली : जसजसा आषाढ महिन्याचा शेवट येतो आहे, तसतसं सगळ्यांना गटारीची प्रतीक्षा आहे. श्रावणाआधी येणारी ही आषाढ अमावस्या ज्याला गटारी म्हणतात. 25 जुलै 2025 पासून श्रावण सुरू होतो आहे. ज्याआधी 24 जुलैला गटारी आहे. पण यादिवशी गुरूवार असल्याने ही गटारी शुक्रवार, शनिवार, रविवार, बुधवार असे वार बघून करण्याचा प्लॅन असले. पण गटारी म्हणजे नेमकं काय? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
श्रावणात मद्य, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असल्याने त्यांचा आपण या काळात त्याग करतो. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं आहेत. श्रावणाच्या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. देवाची मनोभावे उपासना केली जाते. यावेळी आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी देखील याकाळात मांसाहार वर्ज्य मानला जातो.
तर शास्त्रीय कारण असं की या काळात ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण होऊन जात असतं. तर मांस-मासे वेगैरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच शास्त्रीय दृष्ट्या योग्य असतं.
advertisement
त्यामुळेच जे पुढे श्रावणात त्यागायचं आहे अशा गोष्टींसाठी गटारी दिवस साजरा केला जातो. मग जे श्रावणात खातापिता येत नाही ते यादिवशी शेवटचं म्हणून भरभरून खाल्लंपिल्लं जातं. याला गटारी करणं असं म्हणतात.
गटारी म्हणजे काय?
असा प्रश्न तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना, आईवडिलांना किंवा कोणत्याही मोठ्या माणसांना कधी ना कधी विचारला असेल. बहुतेकांनी याचं उत्तर दारू पिऊन लोक गटारात लोळतात म्हणून गटारी असंच दिलं असेल. जुने लोक आजही असंच सांगतात, असाच दावा करतात. तसंच नावाप्रमाणे गटारी म्हटलं की आपल्यासमोरही गटारच येतं आणि या दिवसात बहुतेक लोकांना आपण दारू पिऊन कुठे ना कुठे पडलेलंही पाहतो.
advertisement
तर काही तज्ज्ञांच्या मते, गटारी अशा शब्दच नाही. मूळ शब्द गतहारी असा आहे. गतहार हा शब्द मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत गटारी असं झालं.
advertisement
दीप अमावस्या
याच अमावस्येला दीप अमावस्याही म्हणतात. या दिवशी दीप पूजनालादेखील विशेष महत्त्व असतं. अंधारात प्रकाश निर्माण करणारा दिवा म्हणजे मांगल्याचं प्रतीक. म्हणूनच हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ, श्रावण हे महिने पावसाचे. त्यामुळे पावसासारखी निर्माण झालेली आपल्या आयुष्यातली काळोखी दूर होऊन श्रावणासारखी समृद्धी नांदावी, या उद्देशानं आषाढ महिन्याचा शेवट दीप पूजनानं केला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. तसंच दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देशही नाही.)
Location :
Delhi
First Published :
July 18, 2025 12:35 PM IST