कृषी हवामान : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट, रविवारपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? कृषी सल्ला काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून माघारी परतत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता असून, या परिस्थितीचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे.
गुरुवार (१६ ऑक्टोबर) : जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तुरळक ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
शुक्रवार (१७ ऑक्टोबर) : बुलढाणा, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पावसाची शक्यता.
शनिवार (१८ ऑक्टोबर) : सह्याद्री घाटमाथा, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे.
रविवार (१९ ऑक्टोबर) : नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर व गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, “२० ऑक्टोबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी किरकोळ पावसाच्या सरी पडतील. त्यानंतर मान्सून देशाच्या उर्वरित ५ टक्के भागावरून पूर्णपणे माघारी जाईल.”
दिवाळीपूर्वी अवकाळीचा फटका
या अवकाळी पावसामुळे आधीच नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो. सध्या राज्यातील अनेक भागात सोयाबीन, मका, भात आणि कापूस या पिकांची काढणी सुरू आहे. या पिकांवर पावसाचे पाणी साचल्यास उत्पादनाचा दर्जा घसरू शकतो आणि आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
view commentsकृषी विभाग आणि हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील सावधगिरीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. जसे की, काढणी पूर्ण झालेल्या पिकांची तात्काळ थ्रेशिंग करून साठवणूक करा. शेतात कापणी केलेले सोयाबीन आणि मका पिके मोकळ्या जागेत न ठेवता ताडपत्रीखाली किंवा कोरड्या गोदामात साठवा. अजून शेतात उभी पिके असल्यास, निचऱ्याची सोय करा जेणेकरून पाणथळ होणार नाही. द्राक्ष आणि फळबाग शेतकऱ्यांनी फळांवरील फफूंदजन्य रोगांपासून बचावासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. कांदा उत्पादकांनी साठवलेला कांदा हवेशीर आणि उंच जागी ठेवावा, जेणेकरून ओलावा निर्माण होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 8:26 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट, रविवारपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? कृषी सल्ला काय?