दिलासादायक! अतिवृष्टीभागातील सुधारित पंचनामे पूर्ण, या ६ जिल्ह्यांना मिळणार अतिरिक्त मदत
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
पुणे : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या नव्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात तब्बल ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे ८३ लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले असून, नुकसानभरपाईसाठी ७ हजार ९८ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे मागवण्यात आला आहे.
१७ दिवसांत नुकसानाचा आढावा पूर्ण
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागांनी हे सर्व अहवाल १७ दिवसांत पूर्ण केले. सुरुवातीला गुरुवारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ६१ लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, काही जिल्ह्यांचे पुनर्पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी वाढून ६८ लाख १३ हजार हेक्टर इतकी झाली आहे.
advertisement
सहा जिल्ह्यांसाठी विशेष मदत
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहमदनगर (अहिल्यानगर), धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वीच पंचनामे पूर्ण केले होते. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली आहे.
या निर्णयामुळे या सहा जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्र अतिरिक्त नुकसानग्रस्त क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्वी जाहीर केलेल्या ६१ लाख हेक्टर क्षेत्रावरून नुकसानाची एकूण आकडेवारी ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर इतकी झाली आहे.
advertisement
शेतकऱ्यांना थेट खात्यावर मदत
महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे, राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत केंद्राकडे ७ हजार ९८ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. राज्याचा मदत आणि पुनर्वसन विभाग लवकरच या संदर्भात शासन निर्णय (GR) जारी करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
नुकसानाची सुधारित आकडेवारी
एकूण बाधित जिल्हे: ३४
एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र: ६८,१३,२४२ हेक्टर
एकूण प्रभावित शेतकरी: ८३,१२,९७०
मागविलेली भरपाई रक्कम: ७,०९८ कोटी ६८ लाख २१ हजार रु
परिणाम आणि अपेक्षा
view commentsसप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे हातचे गेले, तर काहींचे फक्त २० ते ३० टक्के उत्पादन वाचले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
दिलासादायक! अतिवृष्टीभागातील सुधारित पंचनामे पूर्ण, या ६ जिल्ह्यांना मिळणार अतिरिक्त मदत