हमीभावात सोयाबीन खरेदी कधी सुरू होणार? नवीन अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean BajarBhav : राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला सुरुवात न झाल्याने नाराजीचे वातावरण आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला सुरुवात न झाल्याने नाराजीचे वातावरण आहे. बाजारातील दर सध्या हमीभावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता शासनाच्या आधारभूत खरेदीकडे लागल्या आहेत. पणन विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवार (ता. २० ऑक्टोबर) पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची आणि त्यानंतर काही दिवसांत खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टिमुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः हातचे गेले, तर काही भागात फक्त दीड ते दोन क्विंटल इतकाच एकरी उतारा मिळाला. अतिवृष्टिग्रस्त भागात हा उतारा तीन क्विंटलच्या वर गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाने यंदा सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ३३६ रुपयांनी जास्त आहे. परंतु, बाजारात सध्या सोयाबीनचे दर ३,००० ते ४,२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,५०० ते २,००० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. दिवाळी जवळ आल्याने अनेक शेतकऱ्यांनी सणासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपला माल खुल्या बाजारातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात आवक वाढली असून दर घसरले आहेत.
advertisement
दरवर्षी दिवाळीपूर्वीच हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत असते, मात्र यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब झाला आहे. यावर्षी हमीदरात खरेदीची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते, पण ती अद्याप झालेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, पारशिवणी, रामटेक, कुही, उमरेड आणि भिवापूर या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. यासाठीची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, सोमवारपासून (ता. २०) नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता जिल्हा पणन अधिकारी अजय बिसेन यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, खरेदीसंदर्भात अधिकृत परिपत्रक अद्याप प्राप्त झालेले नसले तरी ते जाहीर होताच नोंदणी सुरू केली जाईल.
advertisement
दरम्यान, जिल्हा सहकारी संघ, वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन आणि मार्कफेड यांच्यात समन्वयाचे काम सुरू असून, केंद्रांची यादी व कोटा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत परिपत्रकाची वाट पाहावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 6:51 AM IST