चांगल्या पगाराची नोकरी, पण एक कार्यक्रम ठरला 'टर्निंग पॉईंट', जालन्याचा इंजिनीअर शेतीतून झाला लखपती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story: जालन्याचा अभियांत्रिकी पदवी घेतलेला तरुण आज आपल्या मेहनतीने आणि प्रयोगशील वृत्तीने शेतीत यशस्वी झाला आहे. शहरातील सुखसुविधा आणि आकर्षक पगार मागे सोडून, कृष्णाने गावात राहून शेतीत नवे अध्याय लिहिले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जेवळी गावातील २८ वर्षीय कृष्णा नरवाडे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेला हा तरुण आज आपल्या मेहनतीने आणि प्रयोगशील वृत्तीने शेतीत यशस्वी झाला आहे. शहरातील सुखसुविधा आणि आकर्षक पगार मागे सोडून, कृष्णाने गावात राहून शेतीत नवे अध्याय लिहिले आहेत.
कार्यक्रमाने नशीब बदललं
कृष्णा सांगतो की जालना जिल्हा वर्षानुवर्षे कोरड्या हवामानामुळे त्रस्त आहे. पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकरी शेती सोडून इतर व्यवसायांकडे वळले आहेत. पण त्याला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असतानाच २०१७ मध्ये त्याने आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. तिथे त्याला नैसर्गिक शेतीची ओळख झाली. कमी खर्चात, रसायनमुक्त आणि पर्यावरणपूरक शेती करण्याची कल्पना त्याला इतकी भावली की त्याने करिअरचा मार्गच बदलण्याचा निर्णय घेतला.
advertisement
या प्रशिक्षणातून त्याला समजले की नैसर्गिक शेती केवळ नफ्याची नाही, तर जमिनीचे आरोग्य सुधारून शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग आहे. प्रेरणा घेऊन कृष्णाने ४ एकर वडिलोपार्जित जमिनीवर शेती सुरू केली. सुरुवातीला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याने अनेक प्रयोग केले. काही महिन्यांतच जमिनीचे आरोग्य सुधारले आणि पहिल्याच वर्षी त्याला तब्बल ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पूर्वी याच जमिनीवर तो केवळ ५० हजार रुपये कमवत होता.
advertisement
नैसर्गिक शेती ठरली फायदेशीर
कृष्णा सांगतो, “शहरातल्या माझ्या मित्रांना एवढं उत्पन्न मिळायला वर्षे लागतात. पण शेतीत नैसर्गिक पद्धती अवलंबल्यामुळे हे शक्य झालं.” आज त्याच्या शेतात विविध पिकांसोबत कृषिवन प्रणाली (Agroforestry) अवलंबली जाते. तो आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ तज्ञ महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.
शेतीसोबतच कृष्णा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातही सक्रिय आहे. या उपक्रमांतर्गत पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी रिचार्ज स्ट्रक्चर्स उभारले जातात. त्यामुळे परिसरातील बोअरवेल्समध्ये पुन्हा पाणी येऊ लागले. या बदलामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसू लागला. कृष्णा सांगतो, “आज आमच्या पुढच्या पिढीला पाण्यासाठी शहरात धावण्याची गरज राहणार नाही.”
advertisement
प्रकल्पातील त्याचा सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे २५ वर्षांपासून कोरड्या पडलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन. गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि त्यांनी त्या तलावाला “कृष्णा तलाव” हे नाव दिलं. आज त्याच तलावाच्या पाण्यावर तो शेती करतो.
लाखोंचा नफा
view commentsकृष्णा दरवर्षी सुमारे ३ लाख रुपयांचा नफा कमावतो आणि पूर्णपणे स्वावलंबी झाला आहे. त्याचं म्हणणं आहे की, “नैसर्गिक शेती म्हणजे केवळ नफ्याचं साधन नाही, तर निसर्गाशी मैत्री करण्याचा मार्ग आहे.” तसेच कृष्णा आपल्या गावातील आणि आसपासच्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन देतो. “माझं ध्येय आहे की प्रत्येक शेतकरी आनंदी, निरोगी आणि कर्जमुक्त व्हावा. जर आपण निसर्गाला परत काही दिलं, तर तोही आपल्याला दुप्पट परत देतो,” असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
चांगल्या पगाराची नोकरी, पण एक कार्यक्रम ठरला 'टर्निंग पॉईंट', जालन्याचा इंजिनीअर शेतीतून झाला लखपती


