पांढऱ्या सोन्यानं नाही तर काश्मिरी लाल बोरांनी केलं मालामाल, शेतकऱ्याची कमाई ऐकून थक्क व्हाल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Ber Farming: मराठवाड्यात पारंपरिक शेती परवडत नसल्याने काही शेतकरी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करत आहेत. जालन्यातील एका शेतकऱ्याने चक्क काश्मिरी लाल बोरांची शेती केलीये.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: पारंपरिक शेतीतून खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. मराठवाड्यातील शेतकरी देखील आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. जालना जिल्ह्यातील निधोना गावचे शेतकरी रमेश डासाळ यांनी देखील आपल्या शेतीमध्ये असाच खास प्रयोग केला आहे. काश्मिरी रेड ॲपल बोरांच्या शेतीतून ते लाखोंचा नफा मिळवत आहेत. यंदा काश्मिरी बोरांच्या शेतीतून 5 लाखांचा निव्वळ नफा राहील, असा अंदाज लोकल18 सोबत बोलताना डासाळ यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
मराठवाड्यात सोयाबीन, कापूस ही पारंपारिक पिके शेतकऱ्यांसाठी नेहमीच तोट्यात येणारी ठरत आहेत. यामुळेच रमेश डासाळ यांनी हैदराबाद येथून रेड काश्मिरी ॲपल बोरांची कलमे प्रत्येकी 60 रुपयांना एक याप्रमाणे मागवली. 2019 मध्ये आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी रोपांची 10 बाय 15 फुटांवरती लागवड केली. या रोपांची योग्य निगा राखत ठिबकद्वारे पाणी खतांचे बेसल डोस व आवश्यकता असेल तेव्हा बुरशीनाशक, कीटकनाशक फवारण्या घेतल्या. पहिल्याच वर्षी त्यांना 70 हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळालं. तर दुसऱ्या वर्षी तीन लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना या शेतातून मिळालं. रेड ॲपल बोरांच्या शेतीमधून पारंपारिक पिकांच्या तुलनेत चांगलं उत्पन्न मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हे क्षेत्र एक एकर पर्यंत वाढवलं.
advertisement
एकरात साडेचार लाखांचा नफा
गतवर्षी एक एकर क्षेत्रामधून त्यांना खर्च वजा जाता साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. निधोना गावापासून जवळच असलेल्या जालना बाजारामध्ये त्यांना 40 ते 50 रुपये दर या बोरांना मिळाला. तर तब्बल 175 क्विंटल बोरांचे उत्पादन त्यांना या लाल बोरांच्या शेतीतून झालं. यावर्षी हवामानामुळे झाडांवर बोरांची संख्या कमी आहे. त्यामुळे 150 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल. परंतु, बाजारात आवक कमी असल्यामुळे दर देखील 60 ते 70 रुपये प्रति किलो पर्यंत मिळेल. त्यामुळे यंदाही साडेचार ते पाच लाखांचे निव्वळ उत्पन्न या शेतीमधून मिळेल, अशी अपेक्षा रमेश डासाळ यांनी व्यक्त केली.
advertisement
शेतकऱ्यांना आवाहन
पारंपारिक पिकांमधून खर्च काढला तर हातामध्ये काहीही उरत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन काहीतरी पिकी केली पाहिजेत. नवीन पिके केल्याशिवाय आपल्या हातात चार पैसे उरणार नाहीत. शेतकऱ्यांनी शेती करत असताना पारंपरिक पिकांबरोबरच नवनवीन प्रयोग करावेत. त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळवावा, असे आवाहन डासाळ यांनी शेतकऱ्यांना केले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 21, 2024 12:27 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पांढऱ्या सोन्यानं नाही तर काश्मिरी लाल बोरांनी केलं मालामाल, शेतकऱ्याची कमाई ऐकून थक्क व्हाल








