शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्या, कर्माची फळ भोगावी लागणार, भाजप नेत्याचं अजब विधान
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Pasha Patel On Farmer : पावसाने खरीप पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली असून पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांचे विधान शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे.
मुंबई : कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व भाजप नेते पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. धाराशिवसह मराठवाडा आणि राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना पटेल यांनी शेतकऱ्यांनी आता संकटाची सवय लावून घ्यावी, असे विधान केले. "365 दिवसांपैकी तब्बल 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाशी झगडावे लागणार आहे. आपण निसर्गाचे नुकसान केले आहे, त्याची कर्मफळे आता भोगावी लागणार आहेत," असे पटेल म्हणाले.
संपूर्ण नुकसानभरपाई कधीच करू शकत नाही
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेताना पटेल यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकते, पण संपूर्ण नुकसानभरपाई कधीच करू शकत नाही." शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाची सवय लावून घेणे भाग आहे, कारण हवामान बदल, पावसाची अनिश्चितता, दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी हे शेतजीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
advertisement
शेतकऱ्यांची नाराजी
सध्या मराठवाड्यासह अनेक भागांत शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्याने कोलमडून पडले आहेत. खरीप पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली असून पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे पटेल यांनी "संकटाची सवय लावून घ्या" असे म्हणणे शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. शेतकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
विरोधकांचे आक्रमक होण्याचे संकेत
पाशा पटेल यांच्या या विधानावरून विरोधक अधिक आक्रमक होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो. आधीच मदतीच्या घोषणांमध्ये विलंब आणि अपुरी नुकसानभरपाई यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. आता भाजप नेत्याचे हे विधान सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
सध्याची परिस्थिती
view commentsसध्या धाराशिवसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीसाठी आशेने पाहत असताना नेत्यांकडून आलेले हे विधान वादाची ठिणगी ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्या, कर्माची फळ भोगावी लागणार, भाजप नेत्याचं अजब विधान


