2 लाखांवरील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार! पण 'ही' महत्वाची अट पूर्ण करावी लागणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shetkari Karjmafi : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा केली असून त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी होणार असून त्यांच्या सातबारावरील थकबाकीही कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर सहकारी बँकिंग व्यवस्थेलाही होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या कर्जमाफीमुळे आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज शासनाकडून भरले गेल्याने बँकांची वसुली सुधारण्यास मदत होईल. तसेच खासगी किंवा इतर बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अट
ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे.
माहितीनुसार, दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे १० हजार ८६१ शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील उर्वरित रक्कम स्वतः बँकेत भरल्यास त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून माफ केली जाईल, तर त्यावरील रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यास त्यांचे संपूर्ण खाते कर्जमुक्त होऊ शकते.
advertisement
पात्र शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ?
सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. या योजनेमुळे अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय जे शेतकरी आपले कर्ज वेळेवर आणि नियमितपणे फेडत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांनाही सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
advertisement
जिल्हा बँकांनाही मिळणार आर्थिक बळ
या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेली कर्जे शासनाकडून भरली गेल्याने बँकांच्या वसुलीत वाढ होईल आणि नवीन कर्ज वितरणालाही चालना मिळेल.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी सांगितले की, शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात पुन्हा अशी कर्जमाफी होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी उर्वरित रक्कम लवकर भरून ही संधी साधावी. असे केल्यास त्यांना कर्जमुक्त होण्याचा फायदा मिळू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 10:34 AM IST









